
चाचणीचा ‘कल’ नेमका कुठे?
पिंपरी, ता. १६ : दहावी-बारावी नंतर काय? विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे, हे समजून घेण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने कलचाचणी केली जात असे. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून कल चाचणीच होत नसल्याची माहिती समोर आली आहे. आता विद्यार्थ्यांचा कल नेमका कुठे? का फक्त गुणांच्या फुगवट्यावरच अकरावी प्रवेश मिळणार असा प्रश्न? उपस्थित होत आहे. परिणामी, पालक आणि विद्यार्थ्यांनादेखील पर्याय निवडण्यात अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे.
खासगी संस्था तसेच शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कलचाचणी घेण्यात येते होती. याच धर्तीवर शालेय शिक्षण विभागाने २०१६ पासून दहावीच्या विद्यार्थ्यांना व पालकांना मदत व्हावी मुलांचा कल नेमका कोणत्या बाजूने आहे. हे शाळेतच कळाल्यावर त्यांना करिअर निवडण्यासाठी सुलभ व्हावे, या हेतूने कलचाचणीचा उपक्रम सुरू केला होता. कल चाचणीचा अभ्यासक्रम विद्या प्राधिकरण ठरवायचे. तर कल चाचणीची अंमलबजावणी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे करण्यात येत होती. परीक्षा मंडळांच्या माध्यमातून चाचणीची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. २०१५-१६ मध्ये राज्यात प्रथम ही चाचणी घेण्यात आली होती.
गरीब विद्यार्थ्यांपुढे कलचाचणीचा प्रश्न?
राज्यात पाच क्षेत्रीय अभिरुची कसोटी तर; २०१६-१७ मध्ये बहिःस्थ विद्यार्थ्यांसह नियमित विद्यार्थ्यांनी सात क्षेत्रीय मानसशास्त्रीय अभिरुची कसोटी म्हणजेच कलचाचणी दिली होती. ही चाचणी त्या त्या विषयातील तज्ज्ञांच्या सूचनांनुसार विकसित करण्यात आली होती. कल चाचणीनुसार कृषी, कला, वाणिज्य, ललित कला, आरोग्य विज्ञान, तांत्रिक, गणवेशधारी सेवा या सात क्षेत्रामधील अभिरुचीचे मापन केले जात होते. तीन वर्ष ‘ऑनलाइन’ चाचणी घेण्यात आली. २०१८-१९ मध्ये या चाचणीसोबत श्यामची आई फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मानसशास्त्र विभाग व व्यवसाय मार्गदर्शन तसेच मानशास्त्रीय समुपदेशन विभाग यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेली अभिक्षमता चाचणी विद्यार्थी ‘मोबाईल ॲप’द्वारे घेण्यात आली होती. परंतु आता बोर्डाकडून कलचाचणी घेण्याचे बंद केले आहे. म्हणून करिअर पर्याय निवडण्यात अडचणी दिसून येत आहे. कल ओळखायचे सोडून सर्व घेतात म्हणून आपणही प्रवेश घ्यावा, खोट्या प्रतिष्ठेसाठी झेपत नसले तरी विद्यार्थी नको ती शाखा पालकांच्या दबावामुळे निवडत असल्याने विद्यार्थी पुढे पेच निर्माण झाला आहे. तर ज्यांच्याकडे पैसे आहेत ते विद्यार्थी खासगी संस्थांकडून कलचाचणी करुन घेत आहेत. परंतु गरीब विद्यार्थ्यांपुढे खर्चाचा विषय असल्याने त्यांची कलचाचणी होत नाही.
‘‘कोरोनापासूनच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कलचाचणी बंद झाली आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरणाकडून सुरू की माहिती याबद्दल माहीती नाही.’’
- अनुराधा ओक, सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ