
विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू
पवनानगर, ता. १९ : धामणदरा (ता. मावळ) येथे विजेच्या धक्क्याने महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना काल सायंकाळी पाचला घडली.
अशोक रोहिदास मुळे (वय २७, रा. येळसे, ता. मावळ) असे मृत्युमुखी पडलेल्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे.
पवनानगर महावितरण कार्यालयाच्या हद्दीतील धामणदरा आपटी येथे विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना वीज प्रवाहाचा धक्का बसल्याने मुळे हे खांबावरच लटकले गेले. ही घटना सोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येईपर्यंत ते विद्युत वाहिनीमध्ये अडकले गेले. त्यांना खांबावरून खाली घेण्यास उशीर झाला. यानंतर त्यांना पुढील उपचारार्थ काले ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
गेल्या पाच वर्षांपासून ते पवनानगर येथे वायरमन म्हणून काम करत होते. सध्या येळसे येथे वास्तव्यास होते.
फोटो ः 01559