
रावेत बंधाऱ्यातील जलपर्णी हटविण्याची मागणी
हिंजवडी, ता. २१ : शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या पवना नदी पात्रातील रावेत बंधारा तसेच या परिसरातील संपूर्ण नदीपात्र जलपर्णीच्या आच्छादनाने व्यापले आहे. त्यामुळे जलप्रदुषणासह दुर्गंधी पसरून रोगराईला आयते आमंत्रण देणारी जलपर्णी त्वरित काढून नागरिकांना दिलासा देत पर्यावरण हित साधावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांना युवा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे निवेदन दिले आहे. मागील काही दिवसांपासून नदी पात्रात जलपर्णी वाढली असून, बंधाऱ्यातील पाणी दृष्टीस पडत नाही. एवढेच नाही तर पवना नदीपात्रातील जाधव घाट परिसर, केजुबाई बंधारा आदी ठिकाणासह पवना नदीपात्रात सर्वत्र जलपर्णीचा विळखा अधिक घट्ट झालेला आहे. जलपर्णीमुळे पाणी प्रदूषण तसेच परिसरात दुर्गंधी व रोगराई पसरत आहे. या बाबत आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उडवा-उडवीची उत्तरे देतात.
दिवसेंदिवस जलपर्णी फोफावणे ही बाब गंभीर असून, जलचर प्राणी आणि नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. बंधाऱ्यालगत वाढलेली जलपर्णी तत्काळ काढावी व भविष्यात जलपर्णी वाढणार नाही जलपर्णीचे काम ज्या ठेकेदारास दिले आहे, त्याची ही चौकशी करून योग्य ती कारवाई व उपाययोजना कराव्यात. अन्यथा, शिवसेना या प्रकाराविरोधात आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. युवासेना पुणे जिल्हा प्रमुख सागर शिंदे, शहर प्रमुख सचिन सानप, उपजिल्हा प्रमुख अजिंक्य उबाळे, अमित शिंदे, कुणाल दर्शिले यांच्या स्वाक्षरी आहेत.