कोविड : शेअर बाजाराचा तारणहार?
सुहास राजदेरकर
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने (बीएसई) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सात जून २०२१ रोजी त्यांनी तब्बल सात कोटी नोंदणीकृत ग्राहकांच्या खात्यांचा (रजिस्टर्ड इन्व्हेस्टर अकाउंट) मोठा टप्पा पार केला. त्यात सर्वाधिक वाटा (१५०.५४ लाख) अर्थातच आपल्या महाराष्ट्राचा आहे. १८७५ मध्ये काही मोजक्या लोकांनी स्थापन केलेल्या या शेअर बाजाराचे, म्हणजेच त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘कोविड’ महासाथीसारख्या भयंकर संकटकाळात बाहेर अनेक गोष्टी बंद असतांना, केवळ १३९ दिवसांमध्ये त्यांनी ६ कोटींवरून ७ कोटींवर मजल मारली आहे.
नोंदणीकृत ग्राहकांच्या खात्यांमध्ये अशी वाढ होण्याची काय कारणे आहेत, ते पाहूया.
बँका आणि इतर अल्पबचत योजनांचे घसरलेले व्याजदर. अर्थात, ‘मी मागे राहून जाईन,’ अशी भावना. प्रामख्याने परकी गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे अल्पावधीतच वर गेलेला बाजार ‘आयपीओ’द्वारे आलेल्या; तसेच दुय्यम बाजारात असलेल्या असंख्य शेअरनी एका वर्षात मोठा परतावा दिला आहे.