

Mumbai Voter List Fraud
esakal
मुंबईचे आकर्षण केवळ देशात नव्हे तर जगभरात आहे. त्यामुळे मुंबई ताब्यात घेण्याचा डाव महाराष्ट्राबाहेरील राजकीय धुरीण अनेक वर्षांपासून करत आहेत. दिल्लीतील सत्ताधाऱ्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गांवर दिसत आहे. निवडणुका मागून निवडणुका ताब्यात घेऊन व केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून केंद्रातील सत्ताधारी भाजप आपल्या सत्तेची मांड घट्ट करत आहे. आता निवडणूक आयोगालाही हाताशी धरले आहे. त्यातून लवकरच मुंबई स्वतंत्र करून थेट केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या हातात सोपवून त्याचे चंडीगड किंवा लेह करण्याचा डाव शिजतो आहे.
अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या मुंबईच्या प्रारूप मतदार यादीत उघडकीस आलेली अव्यवस्था ज्यात जुनी नावे न काढणे, जिवंत लोकांची नावे गायब होणे, मृत व्यक्तींची नोंद कायम राहणे आणि सर्वांत धक्कादायक म्हणजे एकाच व्यक्तीची नावे दहा–दहा वेळा दिसणे हे सर्व एक भयानक वळण समोर आणले जात आहे. सरळ शब्दात सांगायचे तर मुंबईच्या मतदार संघात घोळात घोळ घातला गेला आहे, आणि या घोळाची जबाबदारी कुणावर टाकायची हे प्रशासनालाच कळत नाही. मुंबईच्या अनेक वॉर्डांमध्ये एकाच व्यक्तीची नावे दोन, तीन नव्हे तर शंभर वेळा दिसली. काही घरे तर अशा नावांनी ‘भरून’ गेली होती की घरातील खऱ्या रहिवाशांचीच नावे यात हरवली. हे नक्की कसे घडले तर उत्तर एकच डेटा व्यवस्थापनाचा संपूर्ण कोसळलेला ढाचा. वर्षानुवर्षांची अद्ययावत न केलेली मतदार सूची, कागदावरील नोंदींचे डिजिटल डेटा तयार करताना झालेली गडबड, बीएलओद्वारे स्तरावर झालेल्या पडताळणीतील चुका, स्थलांतरित लोकसंख्येची नोंद सांभाळताना झालेली विसंगती या साऱ्यांचा घातक परिणाम म्हणजे एकाच मतदाराची नावे अनेक वेळा नोंदली जाऊन प्रणालीने स्वतःच स्वतःच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करून घेतले आहे.