हिंजवडीत IT पार्कच्या झगमगाटातही जपल्या जातायत ग्रामीण परंपरा
अविनाश म्हाकवेकर
हिंजवडी-वाकड परिसरातील श्री म्हातोबा देवाची बगाड जत्रा दरवर्षी चैत्र पौर्णिमेस हनुमान जयंतीला होते. एकीकडे घड्याळाच्या सेकंद काट्याप्रमाणं धावणारं आयटी पार्कचं युग आणि दुसरीकडं तास काट्याप्रमाणं संयमानं साडेतीनशे वर्षांपासून आपल्याला पुढे घेऊन चाललेली संस्काररुपी परंपरा अखंड सुरु आहे. कालचक्राच्या एका खांद्यावर झगमगाट असलेलं आयटी पार्क आणि दुसऱ्या खांद्यावर श्री म्हातोबा देवाची बगाड परंपरा हे पाहताना डोळ्यांचे पारणं फेडते! (Tradition of Hinjewadi village )
दरवर्षी हनुमान जयंतीपासून तीन दिवस हिंजवडी-वाकड या गावचे ग्रामदैवत श्री म्हातोबाचा उत्सव असतो. दोन्ही गावात देवाची मंदिरं आहेत. हिंजवडी ते वाकड मंदिरापर्यंत होणारी बगाड जत्रा म्हणजे उत्सवाचं मुख्य आकर्षण असतं. एक मोठा लाकडी खांब उभा करून त्याला आडवं लांब लाकूड लावून बनवलेला विशिष्ट पद्धतीचा बैलगाडा म्हणजे बगाड. मोठं लाकूड अर्थात ज्याला भाविक मानाचा शेला म्हणतात. शेले आणण्यासाठीची परंपरा तर अधिकच चित्तथरारक. मुळशी तालुक्याच्या निसर्गरम्य ताम्हिणी घाट परिसरातील बार्पे, आडगाव येथील देवाच्या मूळ ठाण्यापासून लागूनच असलेल्या जंगलातून हे शेले तोडून हिंजवडीपर्यंत खांद्यावर कावड करून मजल दरमजल करत पायी आणण्याचा प्रघात आहे. यात सहभागी होणाऱ्यांना शेलेकरी म्हणतात.