पुणे आणि परिसराची वाहतूक कोंडी 'अशी' फुटू शकेल!
पायाभूत सुविधा, भौतिक सुविधा, आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक साधने पुण्यामध्ये मुबलक प्रमाणात आहेत.
सेवानिवृत्तांचे आवडते शहर, शिक्षणाचे माहेरघर, आयटीचे हब, ऑटो उद्योगांचे लोकेशन आणि हेल्थ टुरिझमचे डेस्टिनेशन, अशी बहुविध ओळख असलेल्या पुण्याला सध्या पछाडले आहे ते एकाच समस्येने ती म्हणजे वाहतुकीची कोंडी. पायाभूत सुविधा, भौतिक सुविधा, आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक साधने पुण्यामध्ये मुबलक प्रमाणात आहेत. खाद्यपदार्थांपासून, कपडे, बूट आणि फॅशनचे जगातील सगळे ब्रॅन्ड या शहरात मिळतात. पण, घरातून पाऊल बाहेर काढल्यावर पायी जाण्यासाठी किंवा वाहनातून जाण्यासाठी नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागतो. तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनाही या वाहतूक कोंडीचा हिसका बसला आहे. परदेशातील भारतीय आणि विशेषतः पुण्याशी भावनिक नाते असलेले महाराष्ट्रीयन नागरिकही पुणं चांगलं आहे पण, ट्रॅफिक हा डेंजर प्रॉब्लेम आहे, असेच सांगतात अन त्यातच पुण्याच्या वाहतुकीचं सारं आहे.