पूर्वी दिवाळी आली की प्रत्येक घराच्या भिंतीला चिटकून किल्ला केलेला दिसायचा, पण वाढत्या शहरीकरणामुळे जागेच्या अभावामुळे मुलांना आई-वडील तयार किल्ले आणून द्यायला लागले आहे. सध्याच्या धकाधकीच्या आणि आधुनिकतेच्या काळात मुलांमधील बालपण हरवत चालले असल्याचे दिसून येते. मैदानी खेळ कमी झाल्याने मुलांमधील मैत्रीची नाळ कमी होताना दिसत आहे. एकीतून साकारणाऱ्या अनेक गोष्टी कालबाह्य होऊ लागल्या आहेत. अशा वातावरणात सातारा जिल्ह्यातील एक गाव मला भावले. ते होतं आंबवडे बुद्रुक. किल्ल्यांचं गाव.
सातारा शहरातून सज्जनगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंबवडेकडे जाणारा फलक दिसतो. चिंचोळ्या रस्त्याने गाडी गावात घुसली. अगदी ग्रामीण ढंगाचे हे गाव. शेतकरी कुटुंबे. शेताशिवारात छोटी-छोटी टुमदार घरं तर काही शेतांमध्ये दिमाखात टोलेजंग बंगलेही नजरेस पडत होते. सज्जनगडाची सावली म्हणजे अंबवडे. अगदी गडाला लागून. गावच्या वेशीतून आत जाताच रस्त्याच्या दुतर्फा किल्ल्यांच्या पाट्या दिसू लागल्या. त्यापाट्या पाहून आश्चर्य वाटले. रायगड, सिंहगड, राजगड, तोरणा अशी राज्यातील बहुतेक सर्वच किल्ल्यांची नावे दिसत होती. किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी वाट छोटी असली तरी किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी पांढरी फक्की टाकून किल्ल्याचा मार्ग तयार केला आहे. जिथे गाडी जाऊ शकत नाही. तेथे पार्किंग कोठे करावी, याचे सूचनाफलक येथे जाणीवपूर्वक लावण्यात आले आहेत.