पद्मश्री तुळशी गौडा...कर्नाटकातील अंकोला जवळील होन्नली गावात १९४४ मध्ये जन्म...वय अवघे ७७...आदिवासी (हलक्की) कुटुंबात जन्माला आलेल्या तुळशी गौडा यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले हे त्यांच्या साधेपणा व पारंपारिक वेशभूषेमुळे. अनवाणी आलेल्या तुळशी गौडा पुरस्कार स्वीकारताना टाळ्यांचा नुसता गजर झाला. पुरस्कार स्वीकारायला आल्या तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नमस्कार केला व सोहळ्यानंतर मोदींनी त्यांच्या हाक हातात घेऊन कार्याची प्रशंसा केली. ही छायाचित्रे सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरली आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना पद्म ‘श्री’ देऊन सन्मानित केले असले तरी त्यांना पाहून त्यांनी किती हालअपेष्टा सहन केल्या हे समजू शकेल. मानवाच्या दोन हातात किती ताकद असू शकते हे आणि त्यातून केवढे मोठे कार्य उभे राहू शकते हे तुळशी गौडा यांनी दाखवून दिले आहे. आजच्या प्रसिद्धीच्या व दिखावा करण्याच्या जमान्यात तुळशी गौडा यांनी शांतपणे केलेल्या कामाचा किती गाजावाजा झाला हे पाहून त्यांना नुसता सलाम करून चालणार नाही तर साष्टांग दंडवत घालावा लागेल.
त्यांचा जीवनातील प्रवासही दुःखाने भरलेला आहे. दोन वर्षे वय होतं तेव्हाच वडीलांचे छत्र हरपले. त्यामुळे लहानपणीच काम करावे लागले. वयाच्या १०-१२ व्या त्यांचं वर्षी लग्न झालं. पण त्यानंतर सगळ व्यवस्थित झालं, असं नाही. तेथेही दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होतीच. वयाची पन्नाशी गाठली तेव्हा पतीचे निधन झाले. पण आदिवासी असल्याने समोर पर्याय काहीच नव्हते.
आदिवासी आणि निसर्ग या एकाच नाण्याच्या दोन बाजू. निसर्गातून आपल्याला जे काही मिळते ते घेऊन जगायचं आणि त्या बदल्यात निसर्गालाच देव मानून मनोभावे सेवा करायची, हे आदिवासींची जीवनाची शैली. रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर तुळशी गौडा यांनी निसर्गाचाच हात धरून स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलं. आणि निश्चयाने पेटून उठलेल्या तुळशी गौडा यांनी मग मागे वळून पाहिले नाही.