पुणे - संत ज्ञानेश्वर-तुकाराम महाराज पालखी सोहळ्याकरिता श्रीक्षेत्र देहू-आळंदी येथे भक्तिभावाने दाखल होत असलेल्या वारकरी आणि नागरिकांच्या सोयीसाठी राज्य सरकारतर्फे सुमारे एक हजार कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली.
श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा डोंगर विकास आराखड्यांतर्गत स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विकासकामे पूर्णत्वास नेण्यात आली आहेत. स्वच्छ वारी, सुरक्षित वारी आणि आनंददायी वारी या त्रिसूत्रीच्या जोरावर भाविकांसाठी सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.
या विकासकामांमध्ये प्रामुख्याने रस्त्यांचे रुंदीकरण, पदपथनिर्मिती, बाह्यवळण मार्ग, पार्किंग सुविधा, स्वच्छतागृह आणि पालखीतळ सुविधा विकास आदींचा समावेश आहे. देहू-आळंदीत दाखल होणाऱ्या वारकरी आणि भाविकांना सुरक्षितपणे दर्शन घेता यावे, यासाठी ही विविध विकासकामे उपयुक्त ठरतील, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या कामांचा समावेश
श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा डोंगर आणि सदुंबरे परिसरात एक हजार कोटींची विकासकामे पूर्णत्वास गेली आहेत. देहू विकास आराखड्यातील मुख्य घाटाचे पुनर्निर्माण, गाथा मंदिर परिसर आणि घाटाचे पुनर्निर्माण, भक्तनिवास आणि वैकुंठगमन मंदिर परिसराचा पुनर्विकास, रस्त्यांचे रुंदीकरण, पदपथ, बाह्यवळण मार्ग, आरोग्य सुविधा केंद्रे आणि सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन प्रकल्प आदींचा यात समावेश आहे.
श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा परिसर विकास प्रकल्पांतर्गत योजना पूर्णत्वास नेताना भाविकांना सोयी-सुविधा, सुरक्षित दर्शन आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. काही विकास प्रकल्पांमध्ये भूसंपादनाबाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. परंतु, त्या दूर करून विकास प्रकल्प पूर्ण करण्यात येईल.
- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, पुणे
|