जुन्नरला 37 हजार एकर पिकाचे नुकसान 

जुन्नरला 37 हजार एकर पिकाचे नुकसान 

नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्‍यात ऑक्‍टोबर महिन्यात झालेला अवेळी पाऊस व ढगाळ वातावरणाचा फटका अंदाजे 15 हजार 26 हेक्‍टर (37 हजार 590 एकर) क्षेत्रातील फळ, भाजीपाला, भात, सोयाबीन पिकांना बसला आहे. त्यामुळे 24 हजार 260 शेतकऱ्यांची सुमारे 14 कोटी 33 लाख 78 हजार चारशे रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वाधिक नुकसान द्राक्ष, सोयाबीन, भात पिकांचे झाले आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाट यांनी दिली. 

जुन्नर तालुक्‍यात मागील महिन्यापासून ढगाळ हवामान असून, पाऊस सुरू आहे. तालुक्‍यात प्रथमच ऑक्‍टोबर महिन्यात सलग पाऊस पडला. सर्यप्रकाशाचा अभाव आहे. त्यामुळे काढणीस आलेल्या खरीप हंगामातील भात, सोयाबीन या पिकांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.

भांडवली पीक समजल्या जाणाऱ्या द्राक्ष व डाळिंब पिकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, हंगाम वाया जाण्याची भीती आहे. तालुक्‍यात सर्वाधिक नुकसान द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे. सुमारे चार हजार एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांना फटका बसला आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांनी 27 ऑक्‍टोबर रोजी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत द्राक्ष व इतर पिकांच्या नुकसानाची पाहणी केली. त्या वेळी त्यांनी नुकसानाचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले. 

दरम्यान, बाधित पिकांचा प्राथमिक अंदाज काढून अहवाल तयार केला आहे. त्यानुसार अवेळी पावसामुळे 15 हजार 26 हेक्‍टर शेत जमिनीतील उभ्या पिकांचे 33 टक्के व त्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या सोयाबीन, भात पिकाचे मोठे नुकसान आहे. सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांवर मोठ्या प्रमाणात करपा व डावणी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी दिवसातून दोन वेळा द्राक्ष बागांवर फवारणी करत आहेत. मात्र पाऊस सुरू असल्याने फवारणीचा खर्च वाया जात आहे. सप्टेंबर महिन्यात छाटणी झालेल्या फुलोरा व पोंगा अवस्थेतील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अवेळी पावसामुळे तालुक्‍यातील 375 हेक्‍टर (9 हजार 375 एकर) क्षेत्रातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे तालुका कृषी अधिकारी शिरसाट यांनी सांगितले. 

अवेळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. नुकसानाचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणारा नाही, याची काळजी पंचनामे करताना घ्यावी. 
- अतुल बेनके, आमदार 

कृषी, महसूल व पंचायत समिती विभागाच्या वतीने तालुक्‍यात नुकसानाचे पंचनामे सुरू केले आहेत. सततच्या पावसामुळे पंचनामे करण्यास अडथळा येत आहे. पुढील पाच दिवसांत पंचनामा अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. 
- सतीश शिरसाट, 
तालुका कृषी अधिकारी, जुन्नर 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com