सातबारा उताऱ्यांचे चावडीवाचन

सातबारा उताऱ्यांचे चावडीवाचन

तलाठी आणि तहसीलदार पातळीवर चुका दुरुस्त होणार

पुणे - हस्तलिखित आणि संगणकीकृत सातबारा उतारे यातील चुका दुरुस्त करण्यासाठी शासनाने नागरिकांना संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी सातबारा उताऱ्यांचे चावडी वाचन करण्यात येणार आहे. यामध्ये हस्तलिखित आणि संगणकीकृत सातबारा उताऱ्यांमधील चुका तलाठी व तहसीलदार पातळीवर दुरुस्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे सातबारा उतारे बिनचूक होण्यास मदत होणार आहे. 

केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया लॅंड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम’अंर्तगत’ ई फेरफार हा प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. ई फेरफारची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी स्टेट डाटा सेंटर या ठिकाणी स्थापित केलेले सातबारा उतारे हे हस्तलिखित सातबारा उताऱ्यांशी तंतोतंत जुळणे आवश्‍यक आहे. यामध्ये एकही चूक राहता कामा नये. तसेच, डाटा सेंटरमधील डाटा हा बिनचूक असणे आवश्‍यक आहे. यासाठी शासनाने मागील वर्षी सातबारा उताऱ्यांमधील दुरुस्तीसाठी एडिट मॉड्यूल ही सुविधा उपलब्ध करून दिली. यानंतर सातबारा उताऱ्यांची तपासणी केली असता, 

काही सातबारा उतारे हे संगणकीकृत सातबारा उताऱ्यांशी तंतोतंत जुळत नसल्याचे दिसून आले आहे. 

ई फेरफारच्या अंमलबजावणीत ही अडचण गंभीर स्वरूपाची आहे. या पार्श्‍वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने राज्यातील सर्व तालुक्‍यांतील सर्व गावांमध्ये चावडी वाचनाची विशेष मोहीम घेतली आहे. या मोहिमेमध्ये सातबारा उताऱ्यांमधील चुका या तलाठी आणि तहसीलदार पातळीवर दुरुस्त होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत. 

अन्यथा शिस्तभंगाची कारवाई
अचूक सातबारा उताऱ्यांशिवाय ई फेरफार आणि ई चावडी या उपक्रमांची अंमलबजावणी यशस्वी होणार नसल्याने सर्व तलाठी, मंडल अधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांनी ही शेवटची संधी समजून अचूक सातबारा उताऱ्यांसाठी कठोर परिश्रम घ्यावेत. या मोहिमेअंती होणारे काम हे १०० टक्के अचूक होईल, याची दक्षता घ्यावी. चावडी वाचनाच्या मोहिमेनंतरही सातबारा उताऱ्यांमध्ये त्रुटी, चुका आढळून आल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाणार असून, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करून शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा राज्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिला आहे. 

चावडीवाचन (१६ मे ते १५ जून २०१७) 
ऑनलाइन तपासणीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गावातील सर्व सातबारा उताऱ्यांची पुन्हा तपासणी तलाठ्यांनी करण्याच्या सूचना भूमी अभिलेख विभागाकडून देण्यात आल्या आहेत. यामध्ये चुका असल्यास हिरव्या शाईने दुरुस्त कराव्यात. सातबारा उतारे आणि आठ अ यांचे चावडीवाचन करण्यासाठी तलाठी यांनी गावात योग्य ती प्रसिद्धी करून चावडीवाचनाची वेळ व तारीख निश्‍चित करावी. या ठिकाणी संगणकीकृत सातबारा उताऱ्याची प्रत नागरिकांना पाहण्यासाठी द्यावी व यामधील चुका निदर्शनास आल्यानंतर नागरिकांकडून या ठिकाणी आक्षेप नोंदविता येणार आहे. 

दुरुस्ती, तपासणी (१६ जून ते १५ जुलै २०१७) 
नागरिकांनी सुचविलेल्या दुरुस्त्या पूर्ण केल्यानंतर या सातबारा उताऱ्यांची मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांच्याकडून तपासणी केली जाणार आहे. जेणेकडून सातबारा उतारे बिनचूक होणार आहेत.

ही मोहीम तीन टप्प्यांत राबविणार
ऑनलाइन तपासणी (१५ मे २०१७ पर्यंत) - नागरिकांना सातबारा उतारे महाभूमिलेख या संकेतस्थळावर पाहता येतील. याशिवाय महा ई सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टल आणि सेतू या ठिकाणांहून नागरिकांना सातबारा उतारे उपलब्ध होतील. सातबारा उताऱ्यांबाबत काही आक्षेप असल्यास तलाठी किंवा तहसीलदार यांच्याकडे लेखी नोंदविता येतील. त्याचबरोबर तलाठी यांनी १०० टक्के संगणकीकृत सातबारा उताऱ्यांची तपासणी करणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com