आळंदीतील विद्यार्थ्यावर रोममध्ये ॲसिडहल्ला

Harshit-Agarwal
Harshit-Agarwal

पुणे - आळंदीतील महाविद्यालयात शिकणाऱ्या हर्षित अग्रवाल या विद्यार्थ्यावर रोममधील मेट्रो स्टेशनवर बुधवारी ॲसिडहल्ला झाला. त्याची पैसे आणि कागदपत्रे असलेली बॅगही लंपास केली. या अवस्थेत त्याने धैर्य दाखवीत झालेल्या प्रकाराबद्दल ट्विट केले आणि त्याच्या मदतीसाठी असंख्य हात पुढे आले. तो आता तेथील भारतीय दूतावासामध्ये सुरक्षित आहे.

हर्षित हा मूळचा मध्य प्रदेशमधील रानापूर येथील रहिवासी आहे. तो सध्या आळंदीतील ‘एमआयटी’मध्ये संगणकशास्त्राचे शिक्षण घेत आहे. 

रोममधील एका शैक्षणिक परिषदेत संशोधन प्रबंध सादर करण्यासाठी तो तेथे गेला होता. तो बुधवारी परतणार होता. त्यासाठी रोममधील मेट्रोने तो आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणार होता. टस्कोलाना मेट्रो स्टेशनवर उभा असताना सहा चोरट्यांनी त्याच्यावर ॲसिडहल्ला करून त्याच्याकडील लॅपटॉप असलेली बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला.बॅगमध्ये लॅपटॉपबरोबर महत्त्वाची कागदपत्रे, पैसे, पासपोर्ट असल्याने त्याने बॅग सोडली नाही. परंतु, चोरट्यांनी पुन्हा हल्ला केला आणि त्याची बॅग लंपास केली. त्याचा मोबाईल सुदैवाने खिशात असल्याने तो त्यांना पळविता आला नाही. या हल्ल्यात सुदैवाने त्याला दुखापत झाली नाही. त्याने भेदरलेल्या अवस्थेत प्रथम घरी संपर्क साधला आणि सगळा प्रकार सांगितला.

त्यानंतर प्रसंगावधान राखून त्याने तेथील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. या प्रकाराबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान व परराष्ट्रमंत्री यांना ट्विट केले. त्याची तातडीने दखल घेण्यात आली आणि त्याला मदत करण्यासाठी सरकारी यंत्रणा सरसावली.

हर्षितचे वडील संजय अग्रवाल हे रानापूर येथे असतात. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हर्षितने केलेल्या ट्‌विटमुळे परराष्ट्र मंत्रालय स्तरावरून तत्काळ दखल घेण्यात आली. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी देखील दिल्लीतील इटलीच्या दूतावासातील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. यामुळे त्याला मदत मिळाली आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे हर्षितबरोबर संभाषण देखील झाले आहे. रोमच्या दूतावासातूनही मला दूरध्वनी आला होता. त्यांनी हर्षित सुरक्षित असल्याचे सांगितले.

दोन दिवसांत भारतात परतणार
हर्षित सध्या भारतीय दूतावासात आहे. भारतात त्याला परत पाठविण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे. दोन दिवसांत तो भारतात परतणार आहे. केंद्र सरकार स्तरावरून त्याला खूप वेगात मदत मिळाली. त्यांचा मी आभारी आहे. रोममधील सरकारी यंत्रणेनेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. हर्षित आता सुरक्षित आहे, असे संजय अग्रवाल यांनी सांगितले.

परदेशात जाताना अशी घ्यावी काळजी
परदेशात एखाद्या व्यक्तीवर हल्ला होणे, कागदपत्रे चोरीला जाणे, हे प्रकार अचानक घडतात. तरीही, त्यासाठी खबरदारीचे उपाय आधीच योजले पाहिजेत. सर्वांत प्रथम परदेशात जाण्यासाठी आवश्‍यक असलेली कागदपत्रे स्कॅन करून ते मोबाईलवर वा ई-मेलवर ठेवले पाहिजेत. म्हणजे मूळ कागदपत्रे चोरीस गेली, तरी त्याच्या प्रती संबंधित यंत्रणेला देता येतात.

परदेशात जाण्यापूर्वी विमा काढून घेणे महत्त्वाचे असते. त्यात पासपोर्टसारखी कागदपत्रे वा अन्य वस्तूंची चोरी आणि नुकसान, याची भरपाई समाविष्ट असते. परदेशात हल्ला वा कागदपत्रे चोरी होण्याचे प्रकार झाल्यास घाबरून न जाता तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद नोंदवावी. त्यांच्याकडून एफआयआरची प्रत मिळवावी. तसेच, त्या देशात असलेल्या भारतीय दूतावासाशी संपर्क करावा. तेथील यंत्रणा भारतीय नागरिकांना मदत करण्यास तत्पर असते. पासपोर्ट चोरी गेला असल्यास भारतात परतण्यासाठी दूतावासातून तात्पुरता पासपोर्ट दिला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com