कळस - इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मोहिम आज वनविभागाने राबविली. सहाय्यक वनसंरक्षक मधुकर तेलंग, वनपरिक्षेत्र अधिकारी राहूल काळे यांच्याबरोबर इंदापूर व बारामती तालुक्यातील वनपरिमंडल अधिकारी, वनरक्षक व वनमजुर, राज्यराखीव पोलिस बलाची तुकडी, अर्धा डजनाहून अधिक जेसीबी यंत्राच्या साह्याने अतिक्रमण झालेल्या जमिनीवरील पिके जमिनदोस्त करण्यात आली. आजच्या कारवाईत सुमारे सतरा एकर वनजमिन मोकळी करण्यात आली. गेले वर्षभरापासून तालुक्यातील वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजची कारवाई करण्यात आली. आतापर्यंत तालुक्यातील दहा गावांतील अतिक्रमीत वनक्षेत्र रिकामी करण्यात आली असून, यापुढील काळात मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक मधुकर तेलंग यांनी सांगितले.
उपवनसंरक्षक श्री लक्ष्मी, मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील वनजमिनीचे सर्व्हेक्षण करुन सिमांकण व हद्द निश्चित झाल्यानंतर अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत तालुक्यातील दोनशे एकराहून अधिक जमिनीची हद्द निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वनजमिनीत विविध कारणांसाठी केलेली अतिक्रमणे स्वतःहून काढावीत, असे आवाहन राहुल काळे यांनी केले.
दरम्यान आजच्या या कारवाईमध्ये द्राक्ष, पपईच्या बागा, मका पिकांसारखी पिके जमीनदोस्त करण्यात आली. याचबरोबर या कारवाईचा फटका कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याच्या मळी टाकण्याच्या ठिकाणालाही बसला. मळी टाकण्यासाठी कारखान्याकडून वापरण्यात येत असलेल्या वनविभागाच्या क्षेत्रात प्रवेश होवू नये अशी चारी खोदून वहिवाट बंद करण्यात आली. पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तराळल्याचे दिसून येत होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.