पुणे : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादन 1 जानेवारीला कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार बाबूराव पाचर्णे, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, ज्योती कदम आदी उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, ''अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाच्यावतीने आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक, प्रशासन यांच्यामध्ये सकारात्मक भूमिका आहे. सर्व संबंधितांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या आहेत. आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा याबाबतचे नियोजन उत्तम पध्दतीने करण्यात आले आहे. जनतेची गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांशी समन्वय ठेवण्याचेही त्यांनी सूचित केले. विजयस्तंभ परिसराचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून तो लवकरच मंजूर होईल, असेही ते म्हणाले. पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत पालकमंत्री बापट यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या तयारीचे नियोजन सादर केले. उप विभागीय अधिका-यांना समन्वयक अधिकारी म्हणून नेमण्यात आले असून सर्व शासकीय विभागाकडून करावयाच्या पूर्व तयारी संदर्भात नियमितपणे आढावा घेण्यात येत आहे. गेल्या 2 महिन्यांपासून पेरणे फाटा, सणसवाडी, वढू, वाघोली, कोरेगाव-भीमा या भागांतील विविध संघटना, लोकप्रतिनिधी, नागरिकांशी संपर्क साधून बैठकांच्या माध्यमातून विश्वासनिर्मिती करण्यात आली आहे. स्वच्छता, पिण्याचे पाणी, फीरते शौचालये, एसटी बसेसची उपलब्धता, विजयस्तंभ परिसराचे सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, वाहतूक, खाद्यपदार्थांचे दुकाने, वाहनतळ, सीसीटीव्ही कॅमेरे, अग्नीशमन यंत्रणा आदी बाबत काटेकोर नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी पोलीस प्रशासनाच्यावतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असून जिल्ह्यात आतापर्यंत 250 हून अधिक बैठका घेण्यात आल्या असल्याचे सांगितले. 5 हजार पोलीस, 1200 गृहरक्षक दलाचे जवान, 12 कंपन्या, 400 स्वयंसेवक यांची मदत होणार असल्याचे नमूद करुन सोशल मिडीयावरही प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेमार्फत विशेष लक्ष ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. धार्मिक स्थळे, पुतळे यांच्याकरिता बंदोबस्त आणि परिसरात गस्त ठेवण्यात येत आहे. सर्वांच्या सहकार्याने अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक पाटील यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनीही जिल्हा परिषदेच्यावतीने आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी याबाबत करण्यात येणा-या तयारीची माहिती दिली. बैठकीस विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.