हिमालयातील पर्वत रांगांमध्ये बसविणार 200 स्वयंचलित हवामान केंद्रे
पुणे - अत्यंत लहरी असलेल्या हिमालयातील वातावरणाचा अचूक वेध घेण्यासाठी तेथील पर्वतरांगांमध्ये "स्वयंचलित हवामान केंद्रे' (एडब्ल्यूएस) बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे हवामानात क्षणाक्षणाला होणारे बदल अचूक टिपून त्याच्या आधारावर नजीकच्या काळातील अंदाज वर्तविणे आता शक्य होणार आहे.
हिमकडे कोसळून त्यात गिर्यारोहक आणि शेरपांचा मृत्यू झाल्याच्या घटना काही वर्षांपूर्वी घडल्या. भविष्यात अशा घटनांची पूर्वसूचना मिळावी, यासाठी भारतीय हवामान खात्याने ठोस पावले उचलली आहेत. हिमालयातील पर्वतरांगांवरील वातावरणात वेगाने बदल होतात; पण या बदलांमुळे पुढील अंदाज देण्यासाठी त्याची बिनचूक माहिती घेणे आवश्यक असते. स्वयंचलित हवामान केंद्रांमधून ही माहिती संकलित केली जाईल.
संपूर्ण देशभरात 675 "एडब्ल्यूएस' आहेत. त्याव्यतिरिक्त 200 "एडब्ल्यूएस' हिमालयाच्या रांगांमध्ये बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे तेथील बदलांची माहिती मिळेल. त्यावर आधारित अंदाज वर्तविता येईल. त्याचा थेट परिणाम हिमालयात घडणाऱ्या मोठ्या संभाव्य दुर्घटना टाळता येतील. "एडब्ल्यूएस' बरोबर रडारसह अन्य उपकरणांचीही आवश्यकता असते. ही उपकरणे येत्या वर्षभरात बसविण्यात येणार असल्याची माहिती दिल्ली येथील हवामान खात्याच्या मुख्यालयातून देण्यात आली.
आधुनिक काळात हवामानातील बदलांचा अचूक अंदाज टिपण्यासाठी अद्ययावत उपकरणांचा प्रभावी वापर होत आहे. ढगांचा गडगडाट, वादळ, पाऊस, ढगफुटी, धुके, दरड कोसळणे आणि चक्रीवादळाचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी हवामान शास्त्रीय उपकरणे महत्त्वाची असतात.
अमरनाथ यात्रा सुरक्षित
अमरनाथ यात्रेच्या मार्गावर सहा ठिकाणी "एडब्ल्यूएस' बसविण्याचे कार्य पुण्यातील हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी केले आहे. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे पहलगाम, पंचतर्णी येथील हवामानाची माहिती अचूक मिळू लागली आहे. त्यातून यात्रेचा पुढील मार्ग निश्चित करणे शक्य होत आहे.
|