येरवडा - राज्यातील शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे 15 ऑगस्टपूर्वी न दिल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्याचे जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी दिला. शिवसेनेच्या वतीने येरवड्यातील बजाज अलयांझ इन्शुरन्स कंपनीसमोर आंदोलन करताना ते बोलत होते.
पीकविमा काढणाऱ्या खासगी कंपन्यांनी शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे न दिल्यामुळे शिवसेनेने बुधवारी हे आंदोलन केले. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
शिवतारे म्हणाले, 'राज्यातील शेतकऱ्यांना मागील तीन वर्षांपूर्वीचे पीकविम्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. खासगी विमा कंपन्या केंद्र, राज्य व शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे, त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या मनात असंतोष आहे.''
या वेळी इपको टोकिया कंपनीचे मुख्य व्यवस्थापक एस. सूर्यवंशी यांनी शिवतारे यांना वस्तुस्थिती सांगितली. ते म्हणाले, 'राज्यातील तेरा जिल्ह्यांतील पीकविमा काढण्याचे काम या वर्षी कंपनीला मिळाले आहे. शेतकऱ्यांनी सुमारे पंधराशे कोटी रुपयांचे क्लेम केले आहेत. त्यापैकी पाचशे कोटी रुपये दिले आहेत. 31 जुलैपर्यंत पीक कापणीचा अहवाल आल्यानंतर उर्वरित विमा रक्कम देण्यात येईल.''
येरवडा टपाल कार्यालयापासून आंदोलक मोर्चाने कॉमरझोन येथील विमा कंपनीपर्यंत गेले. आंदोलकांनी विमा कंपन्यांची प्रातिनिधिक अंत्ययात्रा काढली होती. पारंपरिक वाद्य वाजवत मोर्चा कंपनीच्या आवारात येताच आंदोलक कंपनीच्या आवारात शिरले. त्या वेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. कंपन्यांनी नेमकी विम्याची रकम व शेतकऱ्यांची संख्या सांगता येत नसल्याचे सांगताच सुरवातीला गोंधळ उडाला होता.
दरम्यान, जिल्ह्यातील आंदोलक सकाळपासूनच येणार असल्यामुळे नगरसेवक संजय भोसले यांनी सर्व आंदोलकांना पिण्याच्या पाण्याची व अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती.
|