पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येणाऱ्या रिंगरोडमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहेत. त्याविरोधात धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव यांच्या नेतृत्वामध्ये विधान भवनासमोर शुक्रवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता सर्व रिंगरोड बाधितांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून बाधित शेतकरी थेट विधानभवनावर पोचणार आहेत.
राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे शहराभोवती रिंगरोड आरेखित केला असून, पश्चिम व पूर्व असे दोन भाग केले आहेत. हा संपूर्ण रस्ता शहरापासून २० ते ३० किलोमीटर अंतरावरून नागमोडी वर्तुळाकार असून, त्यात ७० टक्के शेतजमिनी बाधित होत आहेत. तर, १० टक्के जंगल जमीन आणि २० टक्के पडीक जमीन आहे. या रिंगरोडमध्ये जिल्ह्यातील हवेली, पुरंदर, भोर, मुळशी, मावळ आणि खेड या तालुक्यांमधील ८४ गावांतील सुमारे ३ हजार ९१२ एकर जमीन बाधित होणार आहे. यामध्ये अडीच हजार एकर बागायती, एक हजार एकर जिरायती आणि चारशे एकर पड जमिनीचा समावेश आहे.
त्यामुळे एक हजार २६६ कुटुंबे भूमिहीन होत आहेत. याव्यतिरिक्त ९१८ राहती घरे, ३७ मंदिरे, ३४० विहिरी, २५१ ओढे, नाले, ५८८ बोअरवेल, १६७ गोठे, २२७ पॉलिहाऊस, दुकाने, ६७ कुक्कुटपालन, दीड लाख झाडे, पाइपलाइन्स, २१८ पाणंद रस्ते, ९४ मुख्य रस्ते या चक्राकार मार्गामध्ये बाधित होत आहेत. एकूण बाधित लोकसंख्या सुमारे २० हजार इतकी आहे. या रिंगरोडला सहा तालुक्यांतून विरोध होत असून, रिंगरोड विरोधी कृती समिती स्थापन झाली आहे. या समितीच्या वतीने डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नितीन पवार आणि प्रल्हाद बारगडे यांनी दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.