पुणे - दिल्लीच्या दिशेने उड्डाण करण्यासाठी रात्री दहा वाजता धावपट्टीवर जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील वातानुकूलित यंत्रणा अचानक ठप्प पडल्याचा फटका प्रवाशांना मंगळवारी बसला. रात्री बारा वाजता हे विमान रद्द केल्याची घोषणा विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केली. त्यानंतर विमानतळावर एअर इंडियाच्या विरोधात प्रवाशांनी जोरदार घोषणाबाजी केली.
एअर इंडियाचे "ए आय 854' हे विमान रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी दिल्लीच्या दिशेने उड्डाण करणार होते. रात्री साडेदहा वाजता प्रवाशांना विमानात बसविण्यात आले. विमानात बसलेले प्रवासी उकाड्याने हैराण झाले. त्या वेळी वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याचे सांगण्यात आले. काही मिनिटांमध्ये ही यंत्रणा सुरू झाली खरी, पण ती परत बंद पडली. यंत्रणा पुन्हा सुरू झाल्याने वैमानिक विमान टॅक्सीवरून धावपट्टीच्या दिशेने चालवू लागला; पण धावपट्टीवर पोचण्यापूर्वीच ही यंत्रणा पुन्हा ठप्प झाली. त्यामुळे विमानातील प्रवाशांना प्रचंड असह्य उकाडा होऊ लागल्याने विमानाचे दरवाजे उघडण्यात आले. पुनःपुन्हा प्रयत्न करूनही वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित होऊ शकली नाही.
त्यामुळे अखेर रात्री बारा वाजता हे विमान रद्द करत असल्याची घोषणा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केली. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दिल्लीवरून अनेक प्रवाशांना परदेशात जाणारी विमाने होती.
|