पुणे (मंचर) : आंबेगाव तालुक्यातील लोणी-धामणी परिसरात शाश्वत पाणी देण्यासाठी नियोजित म्हाळसाकांत उपसा सिंचन योजना व आदिवासी भागातील कळमजाई उपसा सिंचन योजनेचे सर्व्हेक्षण पूर्ण करुन घ्यावे. प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
मुंबई मंत्रालयात मंगळवारी (ता.३०)राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत व जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघातील जलसिंचन प्रकल्पांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली.
“शिरूर तालुक्यातील पाबळ व १२ गावांच्या परिसराची पाणी गरज पूर्ण करण्यासाठी तसेच म्हाळसाकांत व कळमजाई उपसा सिंचन योजना तयार करणे आवश्यक आहे. पाबळ, केंदूर व करंदी गावातील प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेसाठी पाणी आरक्षण करणे व साठवण तलावासाठी जलसंपदा विभागाची जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. पाणी आरक्षित करण्याबाबत व जलसंपदा विभागाची जागा साठवण बंधाऱ्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी.”असे वळसे-पाटील यांनी सांगितले.
यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव (प्रकल्प समन्वय) बसवंत स्वामी, कार्यकारी संचालक विलास रजपूत, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता प्रविण कोल्हे, डिंभे धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सं. ज. माने, कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता सं.गा. सांगळे उपस्थित होते.
“आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघातील सर्व प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जलसंपदा विभागाने आवश्यक कार्यवाही करावी. त्याअनुषंगाने पुण्यात पुन्हा एकदा व्यापक बैठक आयोजित करण्यात येईल. त्यास संबंधित लोकप्रतिनिधी यांनाही बोलवण्यात येईल.”
- जयंत पाटील. जलसंपदा मंत्री.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.