सरकारला फक्त हॉटेल, मॉल आणि बारमधूनच महसूल मिळतो का? व्यापाऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया

Sakal-Exclusive
Sakal-Exclusive

पुणे - राज्य सरकारला फक्त हॉटेल, मॉल आणि बारमधूनच महसूल मिळतो का? तसे असेल, तर बाकीची दुकाने- व्यवसाय बंद करून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यापाऱ्यांमधून गुरुवारी व्यक्त झाली. हॉटेल, बार आणि मॉलला रात्री दहापर्यंत परवानगी आणि किरकोळ दुकाने उघडी ठेवण्यास सायंकाळी सातपर्यंतच परवानगी, या निर्णयामागे नेमकी तर्कसंगती काय आहे, असाही प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार शुक्रवारी पुण्यात याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सुमारे ३० हजारपेक्षा जास्त व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेने चार ऑक्‍टोबरला आदेश काढून हॉटेल, बार आणि मॉल रात्री १० वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. तर, किरकोळ (रिटेल) दुकानदारांवर दुकान सायंकाळी सातलाच बंद करण्याची सक्ती केली आहे. 
या विसंगतीचे वृत्त गुरुवारी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर पुणे व्यापारी महासंघ, पुणे इलेक्‍ट्रॉनिक्‍स हायर पर्चेस असोसिएशन, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनीही दुकाने रात्री किमान नऊपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली. मात्र, त्यावर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत निर्णय झाला नाही. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेशाबाबत ‘आढावा घेऊन बोलतो’, असे सांगितले तर, ‘या बाबतचा आदेश पोलिसांनी काढलेला नाही,’ याकडे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लक्ष वेधले. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या बाबत ‘तीन-चार दिवसांत बघू’ असे सांगितले. पालकमंत्री पवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातही दुकाने सायंकाळी सातला बंद करण्यास पोलिसांकडून भाग पाडले जात असून हॉटेल, बार तेथेही रात्री पर्यंतच खुले आहेत. सध्या अधिक महिना सुरू आहे तसेच १७ ऑक्‍टोबरपासून नवरात्र सुरू होत असून, २५ ऑक्‍टोबरला दसरा आहे. १४ नोव्हेंबरपासून दीपावली सुरू होत आहे. या सणांमुळे नागरिकांची वर्दळ बाजारपेठेत होण्यास सुरवात झाली आहे. मात्र, दुकाने सायंकाळी सातला बंद होत असल्यामुळे त्यांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

व्यापारी म्हणतात...

  • बार, हॉटेल, मॉलमध्ये कोरोना होत नाही आणि फक्त दुकानांत होतो का? 
  • नोकरदार सायंकाळी सहानंतर घरी आल्यावरच खरेदीसाठी बाहेर पडतात
  • दुकानांमध्ये ३० टक्के विक्री सायंकाळी सात ते रात्री नऊ दरम्यान होते
  • हॉटेल, बारमध्ये ग्राहक बसतात, पाणी पितात, वस्तू हाताळतात, तसे दुकानांत होत नाही 
  • सणासुदीच्या दिवसांत दुकानदारांवर अन्याय कशासाठी?
  • बार, हॉटेलच्या तुलनेत दुकानांत ग्राहकांची काळजी अधिक घेतली जाते

शहराच्या अर्थचक्राला गती देणे गरजेचे आहे. तसेच व्यापारी आणि ग्राहक यांच्या सुविधेसाठी दुकानांची वेळ वाढविणे गरजेचे आहे. दुकानांना रात्री नऊपर्यंत परवानगी देण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.
- मुरलीधर मोहोळ, महापौर

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com