सुगंधी फिनेलसाठी हट्ट

Pune-Municipal
Pune-Municipal

पुणे - शहरातील गल्लीबोळात आता फिनेलचा सडा टाकला जाणार आहे. त्यामुळे शहर निर्जंतुक होत बाराही महिने सुगंधी राहणार आहे! यासाठी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून, तब्बल ८० लाख रुपयांचे फिनेल खरेदी करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच वॉर्डस्तरीय निधीतून ३० नगरसेवक इतक्‍या मोठ्या किमतीचे फिनेल घेणार आहेत. नगरसेवकांपाठोपाठ प्रशासनानेही या वर्षी दहापट फिनेलची मागणी करीत, त्याच्या खरेदीचा हट्ट धरला आहे. फिनेल खरेदीसाठी स्वच्छ भारत अभियानाचे कारण दिले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत अभियानाच्या स्पर्धेत गेल्या वर्षी पुण्याची गच्छंती झाली.या अभियानाने शहरात फारशी गती घेतलीच नाही, तरीदेखील सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी शहरात ही मोहीम यशस्वी करण्याचा विडा उचलल्याचे फिनेल खरेदीच्या प्रस्तावांवरून दिसून येत आहे. विशेष म्हणजे एकामागोमाग वित्त आणि क्षेत्रीय कार्यालयांकडे नगरसेवक आणि खातेप्रमुखांचे प्रस्ताव धडकत असतानाही, त्यावर आक्षेप घेण्याचे धाडस अद्याप कोणीही दाखवत नाही.

ठराविक नगरसेवक वगळता फिनेल खरेदीची पुसटशी कल्पनाही अन्य नगरसेवकांना नसल्याचे त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवले. फिनेल खरेदीत कोथरूड आणि कर्वेनगरातील नगरसेवक पुढे आहेत. स्वच्छतागृहांच्या साफसफाईसाठी फिनेल पुरविण्यात येणार आहे, असा खुलासा या नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. 

पहिल्यांदाच एवढी मोठी खरेदी
आरोग्य खात्याच्या सल्ल्यानुसार घनकचरा व व्यवस्थापन विभागाकडून त्याची खरेदी करण्यात येते. मात्र यंदा पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणात फिनेल घेण्यात येणार असल्याने महापालिकेच्या वित्त खात्यालाही त्याबाबत प्रश्‍न पडला आहे. तरीही प्रस्तावानुसार कार्यवाही करण्याचा निर्णय या खात्याने घेतला आहे. 

फिनेलची आवश्‍यकता का?
सार्वजनिक ठिकाणी फिनेलचा वापर करणे आवश्‍यक आहे. त्यानुसार संबंधित खात्याने त्याची खरेदीही करावी. वॉर्डस्तरीय निधीतून नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची कामे केली जातात. मात्र यंदा या निधीतून फिनेल खरेदीसही सुरवात झाली आहे. कोणत्या स्वरूपाचे आणि कशासाठी फिनेल हवे, हेदेखील नगरसेवकांना सांगता येत नाही. फक्त स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करायची असल्याचे कारण देत हे प्रस्ताव मंजूर करून घेतले जात आहे. किमान दोन ते चार हजार लिटरची मागणी नगरसेवकांनी केली आहे.

पावसाळ्यात निर्जंतुकीकरणासाठी फिनेल वापरण्यात येणार आहे. यामुळे स्वच्छ भारत अभियानाला गती मिळणार आहे. त्यासाठी फिनेल घेण्यात येत आहे. त्यानुसार, दहा हजार लिटर फिनेल घेण्याबाबतचा प्रस्ताव दिला आहे. 
- ज्ञानेश्‍वर मोळक, प्रमुख घनकचरा व व्यवस्थापन विभाग, महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com