विवेकानंदांचे तत्त्वज्ञान हीच डोम उभारणीची प्रेरणा

Vishwanath-Karad
Vishwanath-Karad

लोणी काळभोर येथे जगातील धर्म आणि तत्त्वज्ञान यांना एकत्र आणणारी भव्य वास्तू उभारली आहे. तिचे उद्‌घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आज (मंगळवारी) होत आहे. त्या उभारणीमागील प्रेरणा काय, याबद्दल एमआयटीचे संचालक राहुल कराड यांचा हा लेख...

शिक्षणाचं अंतिम ध्येय हे शांतता नांदविणे, हेच आहे. विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय करून या व्यवस्थेतून सुसंस्कृत पिढी तयार झाली, तर जगभरात शांतता नांदू शकेल. स्वामी विवेकानंदांनी हेच तत्त्वज्ञान सांगितले. तीच प्रेरणा घेऊन गेली चार दशके डॉ. विश्‍वनाथ कराड काम करीत आहेत. एमआयटी शिक्षण संस्थेने लोणी काळभोर येथे उभारलेल्या जगातील सर्वांत मोठ्या भव्य डोमच्या उभारणी मागेदेखील हीच प्रेरणा आहे. सगळे धर्म, सगळे विचार आणि तत्त्वज्ञान एकत्र आणण्याचा प्रयत्न यातून डॉ. कराड यांनी केला आहे. जगात मानवतावाद वृद्धिगंत करण्यासाठी ज्यांनी मूलभूत विचार दिला, त्यासाठी प्रयत्न केले, असे विचारवंत, शास्त्रज्ञ, धर्मसंस्थापक अशा ५४ महात्म्यांचे पुतळे यात स्थापित करण्यात आले आहेत. शिक्षण संस्था या केवळ पारंपरिक शिक्षण देण्यासाठी नाहीत, तर त्या जागतिक शांतीचा पाया आहेत. हाच विचार या उभारणीमागे आहे.

शिक्षण घेताना ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविता यावीत, जगाला विचार देणाऱ्या महान लोकांची ओळख नव्या पिढीला व्हावी, तसेच शिक्षण घेऊन विध्वसंक प्रवृत्ती तयार न होता, चांगला आणि विचारी माणूस तयार होऊन सलोख्याने, शांतीने जगणारा समाज तयार व्हावा, हाही डॉ. कराड यांचा उद्देश आहे. त्यादृष्टीने ही वास्तू आदर्श आणि स्थापत्य कलेचा सुंदर आविष्कार असणार आहे. डॉ. कराड यांनी वय वर्षे ६५ असताना त्यासाठी एक विचार घेऊन काम केले आणि चौदा वर्षांच्या परिश्रमातून आणि दृढनिश्‍चियातून ही वास्तू उभारली आहे. ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले यांचा महाराष्ट्र आपण म्हणतो. हे या राज्याचे तत्त्वज्ञान आहे, ती आपली ओळख आहे. तशी प्रत्येक देशांची ओळख आहे. हीच ओळख या वास्तूमधून होणार आहे. त्यामुळे जगातील कोणताही माणूस भारतात आला, तर त्याला या वास्तूला भेट द्यावी वाटेल. एवढी भव्यता आणि तात्त्विक बैठक या वास्तूच्या पायाशी आहे. सर्वसमावेशक अशी भारताची संस्कृती यातून प्रतित होणार आहे. ती पाहून जगाला तो सांगू शकेल, एवढं त्याचं महत्त्व असणार आहे. रोज दोन हजार लोक ही भव्य वास्तू पाहण्यासाठी येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com