Pune-Flood
Pune-Flood

ही तर केवळ धोक्‍याची घंटा!

विकास हवा; पण कोणती आणि कोणाची किंमत मोजून! पंचवीसहून अधिक निष्पाप पुणेकरांचे प्राण काही तासांच्या आत पावसाने घेतले. अतिवृष्टीने हा प्रकार झाल्याचे समाधान मानून गप्प बसावे एवढी छोटी ही घटना निश्‍चितच नाही. कात्रज- मांगडेवाडीप्रमाणे शहराच्या चारही बाजूंनी पुण्याभोवती मृत्यू घोंघावतोय..! याची ही केवळ एक झलक होती... 

पुणे शहराचा आकार बशीसारखा आहे. त्याच्या चारही बाजूंना असणाऱ्या टेकड्यांमुळे शहराचे हवामान अल्हाददायक राहते. खडकवासला आणि त्याच्यावर असणाऱ्या धरणांमुळे शहराला मुबलक पाणीपुरवठा होतो. शहराच्या आसपास असणाऱ्या टेकड्यांपासून उगम पावणारे ओढे-नाले हे वर्षानुवर्षे शहराचे पर्यावरण जपण्याचे काम करीत आहेत; पण गेल्या दहा-पंधरा वर्षांत याच नैसर्गिक स्रोतांवर विकासाच्या नावाखाली डल्ला मारण्यात आला आहे, त्यामुळेच विकास आराखड्यातून अनेक ठिकाणचे ओढे-नाले गायब करण्याचा प्रताप तत्कालीन नियोजनकर्त्यांनी केला. त्याचे भोग आता सर्वसामान्य पुणेकरांना भोगावे लागत आहेत. 

बुधवारी रात्री झालेल्या १०० ते १३० मिलिमीटर पावसाने अर्धे पुणे संकटात सापडले. लोकांची घरी जाण्याची वेळ, तेव्हाच पाऊस आला आणि ओढे-नाले भरून वाहू लागल्याने सर्वत्र हाहाकार माजला. कात्रजच्या घाटातून उगम पावणाऱ्या आंबिल ओढ्याला नदीचे रूप आले. ओढ्याच्या कडेला भराव घालून त्यावर बांधलेल्या भिंती फोडून पाणी लोकांच्या घरात घुसले. 

कात्रज पट्ट्यात सोमवारपासूनच पाऊस पडत होता; पण बुधवारी कहर झाला. भिलारेवाडी, मांगडेवाडी, गुजर- निंबाळकरवाडी या कात्रज घाटाच्या पट्ट्यातील सहा वाड्यांच्या भागातून मोठ्या प्रमाणावर पाणी थेट कात्रजच्या पेशवे तलावाकडे आले. या पट्ट्यात पडलेला पाऊस त्या भागात थांबलाच नाही. या भागात सध्या मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत आहे, त्यामुळे एकतर मोठ्या प्रमाणावर या भागात टेकडीफोड होत आहे, दुसरीकडे प्लॉटिंग पाडताना ओढे-नाले सर्रास बुजविण्यात आले आहेत. या सर्वांचा परिणाम बुधवारी रात्री दिसून आला. 

कात्रज बोगद्याच्या दोन्ही बाजूंना आजही टेकडीफोड सुरू आहे. प्रश्‍न हा आहे, की जे सर्वसामान्य नागरिकांना दिसते, ते जिल्हा प्रशासनास का दिसत नाही? हीच बाब महापालिका प्रशासनालाही लागू होते. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी विकास आराखड्यात आणि नकाशावर दिसणारे ओढे-नाले कुठे गेले? जे नाले आहेत त्यांची रुंदी कमी झाल्यानंतर कोणती कार्यवाही करण्यात आली? 

आंबिल ओढ्याच्या दोन्ही बाजूंना भराव टाकण्यात येत होते, त्या वेळी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन नेमके कोठे होते? केवळ पावसाच्या माथी मारून या गंभीर प्रश्‍नाला मुळीच बगल देता येणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ज्या घरातील निष्पाप लोकांचे बळी गेले, त्यावर थातूरमातूर उत्तरे देऊनही भागणार नाही. गरज आहे, ती ठोस पावले उचलण्याची; नैसर्गिक स्रोत अगदी डोंगरमाथ्यापासून नदीपर्यंत जपण्याची.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com