राष्ट्रभक्तीच्या विचारांचा वसा घेतलेल्या अरुणा मराठे 

राष्ट्रभक्तीच्या विचारांचा वसा घेतलेल्या अरुणा मराठे 

एखाद्या विचारांनी प्रेरित होऊन अवघे जीवन त्यात झोकून देणारे सध्याच्या युगात पाहायला मिळणे तसे दुर्मिळच. पण, चिंचवड येथील अरुणा मराठे (वय ७०) यांनी स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्रभक्तीच्या विचारांचा वसा घेतला. गेल्या ३६ वर्षांपासून राष्ट्रभक्तीचे हे बीज जनमानसात रुजविण्याचे काम अविरतपणे त्या करीत आहेत. आजच्या विज्ञान, माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातही अरुणा मराठे यांनी राष्ट्रप्रेम विशेषत: विवेकानंद यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन चालणाऱ्या युवकांची एक मोठी फळीच उभी केली आहे. राष्ट्रप्रेमाचे गोडवे गाणाऱ्या भल्याभल्यांना थक्क करणारे मराठे यांचे हे कार्य केवळ शब्दातीत...

एखाद्या विचारांतून प्रेरणा घेऊन राष्ट्रसेवेसाठी घराबाहेर पडणे ३६ वर्षांपूर्वी एखाद्या विवाहितेसाठी सोपे नव्हते. मात्र, पती अरविंद मराठे यांच्या पाठिंब्यामुळेच त्या विवेकानंदांचे आदर्श राष्ट्रनिर्मितीचे विचार घेऊन घराबाहेर पडल्या. १९६७ मध्ये पुण्यातील स. प. महाविद्यालयातून बीएस्सी झालेल्या अरुणाताईंनी महाविद्यालयीन जीवनात विवेकानंदांनी लिहिलेली अनेक पुस्तक वाचली. त्यातूनच प्रेरणा घेत विवाहानंतर (१९८०) त्या कन्याकुमारी येथील युवा शिबिरातही (विवेकानंद केंद्र) सहभागी झाल्या. तेथे संपूर्ण आयुष्य संन्यासी वृत्तीने राहून राष्ट्रकार्यासाठी झोकून देणारे अनेक जण पाहिले. त्या प्रभावित झाल्या. चिंचवडमध्ये परतल्यानंतर विवेकानंद केंद्राची शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्यांनी केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रहित साधण्याचा वसा घेतला. संसार (पती, दोन मुले) राष्ट्रकार्याची सांगड घालत समाजात विवेकानंदांचे विचार पेरण्याचे एकहाती कार्य सुरू केले. शाळा-शाळांमध्ये भेटी दिल्या. सशक्त भारत घडविण्यासाठी विवेकानंदांचे विचार महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांना पटवून दिले. काही शाळांनी मराठे यांच्या विचारांचा आदर केला. तर, काही शाळांनी टाळाटाळही केली. तरीदेखील, त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. शालेय मुलांशी गप्पा मारून, खेळ खेळून, स्पर्धा घेऊन गोष्टीरुपाने त्या विवेकानंदांचे जीवन उलगडायच्या. कालांतराने शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे घेऊ लागल्या. 
आता केवळ शालेय विद्यार्थीच नाही, तर महिला, ज्येष्ठ नागरिक, युवा, प्रौढ या सर्वांसाठीच त्या योग, संस्कार शिबिरे, स्वाध्याय-आध्यात्मिक वर्गांच्या माध्यमातून त्या विवेकानंदांचे विचार पोचवतात. १५ ऑगस्टच्या निमित्ताने राष्ट्रभक्तीपर समूह गीताच्या स्पर्धाही घेतात. आज अनेक युवक केंद्राशी जोडले गेले आहेत. स्वामीजींचे विचार प्रत्यक्ष आणण्याचे कार्य अरुणाताई वयाच्या ७० व्या वर्षी तितक्‍याच नेटाने करत आहेत. सातत्यपूर्ण वाचन, मनन यातूनच त्या अत्यंत प्रभावीपणे विचार मांडतात. आजची युवा पिढी बिघडली आहे, अशी ओरड होते. परंतु, विचारांची योग्य मांडणी समोरच्या व्यक्तीमध्ये आंतर्बाह्य बदल घडवू शकते, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com