पालकांनीही जागरुक राहायला हवे

Education
Education

पुणे - ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती, डिजिटल शाळा, सरकारने केलेले विशेष प्रयत्न यामुळे पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख काही प्रमाणात सुधारल्याचे असर या संस्थेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मात्र, शाळांमधील सुविधांबरोबरच शिक्षकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज असून, पालकांनीदेखील मुलांच्या शिक्षणाबाबत जागरूक राहण्याची गरज शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

या अहवालात प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधाल्याचे सांगण्यात येत असले तरी ही सुधारणा पुरेशी नाही. आणखी मोठा पल्ला गाठावा लागेल. त्यासाठी सरकारी शाळांबरोबरच खासगी शाळांकडे लक्ष देण्याची गरज या तज्ज्ञांनी व्यक्त केली. 

या संदर्भात बोलताना शालेय शिक्षणाच्या अभ्यासक श्रुती पानसे म्हणाल्या, ‘‘पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती गेल्या काही वर्षांमध्ये सुधारली आहे. विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. या शाळांमध्ये काही वर्षांपासून पारंपरिक शिक्षणाबरोबरच ज्ञानरचनावादी पद्धतीने शिक्षण सुरू करण्यात आले आहे. या पद्धतीमुळे जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती सुधारली आहे. मात्र, शाळांमध्ये शिक्षकांची संख्या खूप कमी असून, त्यांच्यावर अनेक प्रकारची कामे सोपवली जातात. साहजिकच त्याचा परिणाम त्यांच्या शिकवण्यावर होतो. शाळांच्या सुविधांबरोबरच शिक्षकांच्या समस्यांकडे प्रशासनाने लक्ष दिले तर, ही परिस्थिती आणखी सुधारेल.’’

‘‘विद्यार्थ्यांच्या गणितामधील प्राथमिक संकल्पनाच पक्‍क्‍या नाहीत. बेरीज, भागाकार, वजाबाकी ही चिन्हेदेखील मुलांना ओळखता येत नाहीत. यामध्ये शिक्षक कमी पडत आहेत,’’ असे मत व्यक्त करून मंजुषा वैद्य म्हणाल्या, ‘‘शिक्षकांना अत्याधुनिक पद्धतीने शिकविण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. गणित हा विषय विविध पद्धतीने, प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शिकवला गेला पाहिजे. मात्र, आपल्याकडील बहुतेक शिक्षकांकडे कल्पकतेचा अभाव दिसून येतो. हा अहवाल अगदी बरोबर असून काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. मात्र, समाधानकारक अशी ही सुधारणा म्हणता येणार नाही.’’ 

अ. ल. देशमुख म्हणाले, ‘‘राज्य सरकारने सातत्यपूर्ण सर्वंकष शिक्षण या पद्धतीचे प्रशिक्षण शिक्षकांना देऊन ही पद्धत अधिक प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने केलेले प्रयत्न यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर शाळांमध्ये तंत्रज्ञानाच्या वापरातून शिक्षण सुरू करण्यात आल्यामुळे मुलांच्या आकलन क्षमतेमध्ये वाढ होत आहे.’’

शाळांमध्ये विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे ‘असर’च्या अहवालातून दिसून येते. सतत होणाऱ्या परीक्षा आणि पालकांची जागरूकता यामुळे गुणवत्ता वाढली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने उत्तरे शोधण्याची सवय शिक्षकांनी मुलांना लावावी. पाठांतराऐवजी संकल्पना समजून घेण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा.
- नीलिमा आपटे, शिक्षण अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com