चाकण ठाण्यावर हल्लाबोल

चाकण ठाण्यावर हल्लाबोल

चाकण/आंबेठाण - भामा आसखेडच्या १९ आंदोलकांसह अन्य शंभर लोकांवर ७ एप्रिलला गुन्हे दाखल करण्यात आले होते. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोप करीत गुन्हा दाखल आहे तर अटक करा, नाहीतर दाखल गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत यासाठी भामा आसखेड आंदोलकांनी रविवारी (ता. १५) चाकण पोलिस ठाण्यावर हल्लाबोल केला. यावेळी जवळपास २०० ते २५० आंदोलक शेतकरी उपस्थित होते. 

चाकण पोलिस ठाण्यात झालेल्या या बैठकीला भाजपचे खेड तालुका अध्यक्ष अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, पंचायत समितीचे उपसभापती अमोल पवार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, माजी सदस्य अनिलबाबा राक्षे, सोमनाथ मुंगसे, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, सुनील देवकर, धैर्यशील पानसरे, राहुल नायकवाडी, कैलास लिंभोरे, अमोल पानमंद, दत्तात्रय मांडेकर, काळूराम पिंजण यांच्यासह शिवसेना वगळता विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

भामा आसखेडचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चाकण पोलिसांनी सात एप्रिलला १९ आंदोलकांसह अन्य जवळपास ८० ते १०० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिली त्यांना आम्ही त्रास दिला नाही. ते आम्हाला ओळखतदेखील नाहीत. आजवर आम्ही प्रशासनाला वेठीस धरले नसून सहकार्य केले आहे. आम्ही केवळ उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून आंदोलन करीत आहे. आम्ही आंदोलक लाभ क्षेत्राच्या नागरिकांच्या विरोधात नाही. उद्या आम्हाला आणि तुम्हाला पाणी राहणार नाही, असे आंदोलकांच्या वतीने देविदास बांदल आणि सत्यवान नवले यांनी सांगितले. माजी उपसभापती बन्सू होले, चांगदेव शिवेकर, सत्यवान नवले, देविदास बांदल, बळवंत डांगले यांनी भावना व्यक्त केल्या. या वेळी पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी आंदोलक आणि सर्वपक्षीय नेते यांच्याशी चर्चा केली आणि प्रशासनाची सहकार्याची भावना असून जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी सर्व मागण्या मान्य केल्या आहेर्, असे सांगितले. फक्त आंदोलन सनदशीर मार्गाने करावे आणि कायदा हातात घेऊन नये, असे सांगितले.

मृत व्यक्तीवर गुन्हा...
भामा आसखेडचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १९ आंदोलकांसह अन्य जवळपास ८० ते १०० लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात नामदेव बांदल नावाच्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे; परंतु अक्‍ख्या भाम खोऱ्यात नामदेव बांदल नावाची एकच व्यक्ती असून तिचा मृत्यू झाल्याचे या वेळी आंदोलकांनी सांगितले. त्यामुळे मयत असणारा माणूस आवर्तन रोखण्यासाठी कसा जाईल, असा सवाल करीत यावरून ही फिर्याद आणि दाखल केलेले गुन्हे खोटे आहेत. असा आरोप आंदोलकांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com