‘भामा आसखेड’ सहा महिन्यांत पूर्ण - डॉ. अमोल कोल्हे

bhama-askhed-dam
bhama-askhed-dam

पुणे - भामा आसखेड प्रकल्पबाधितांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्री अजित पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील आणि मी स्वतः योग्य समन्वय साधून प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे या योजनेचे काम लवकरच सुरू होऊन सहा महिन्यांत पुणेकरांना पाणी मिळेल, असा विश्वास शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गुरुवारी व्यक्त केला.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित कामांसंबंधी डॉ. कोल्हे यांनी आज पुणे महापालिकेत आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस महापालिका विरोधीप क्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘भामा आसखेड योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु, प्रकल्पबाधितांच्या काही प्रश्नांमुळे हे काम सध्या बंद आहे. शहराला जसे पाणी हवे आहे, तसेच बाधितांचेही काही प्रश्न आहेत. शेतकऱ्यांशी सुसंवाद साधून समन्वयाने हे प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही लोकप्रतिनिधी करीत आहोत. याला यश मिळाले असून, लवकरच काम सुरू होईल आणि ते पूर्णही होईल.’’

नाशिक रस्त्याचे काम दोन वर्षांत 
पुणे-नाशिक आणि प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘पुणे-नाशिक रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, खेड घाट बायपास रस्त्याचे काम पूर्णत्वास येत आहे. याशिवाय, इतर चार बायपासच्या कामांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, पावसाळ्यानंतर काम सुरू होऊन दोन वर्षांत रस्त्याची सर्व कामे पूर्ण होतील. तसेच, नियोजित पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचा डीपीआर तयार असून, या मार्गासाठी केंद्रीय स्तरावर हालचाली सुरू आहेत. हे काम लवकरात लवकर सुरू होऊन ते पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू.’’ याशिवाय, अष्टविनायक रस्ता पूर्ण करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी नमूद केले.

चाकणसाठी विमानतळ हवाच
दुर्दैवी धोरण आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींची भूमिका, यामुळे खेडचा विमानतळ दुसरीकडे गेला आहे. खरेतर चाकण एमआयडीसीचा विचार करता, या परिसरात किमान देशांतर्गत वाहतुकीसाठी तरी विमानतळ होणे गरजेचे आहे. यासंबंधी मी यापूर्वीच संसदेत बोललो आहे, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

हडपसरमधील प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना
हडपसर मतदारसंघातील रस्ते, पाणी, कचरा, कात्रज चौकातील वाहतुकीचा प्रश्न, कोंढवा चौक उड्डाण पूल, कात्रज-कोंढवा रस्ता, रेल्वे अंडरपास पूल ही कामे महिनाभरात मार्गी लावण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. तिसरी महापालिका झाली, तर फायदाच होईल. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या इतर गोष्टींचा विचार होणे गरजेचे, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com