कोरेगाव भीमा हिंसाचार : हिंदुत्ववादी संघटनांचा पूर्वनियोजित कट

कोरेगाव भीमा हिंसाचार : हिंदुत्ववादी संघटनांचा पूर्वनियोजित कट

पुणे - भीमा कोरेगाव हिंसाचार हा हिंदुत्ववादी संघटनांचा पूर्वनियोजित कट होता, त्यानुसार तो घडवून आणला, हे भीमा कोरेगाव समन्वय समिती अहवालाने स्पष्ट केले आहे. हा अहवाल ग्रामीण पोलिसांनी नाकारला. हिंसाचारामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद होती, त्यांनी पारदर्शकपणे तपास केला नाही. राजकीय पक्ष व हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावाखाली पोलिस हे प्रकरण दडपत आहेत, अशी टीका उपमहापौर व भीमा कोरेगाव समन्वय समितीचे सदस्य डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली आहे. 

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाबाबत चर्चा करण्यासाठी 9 जानेवारी रोजी दलित समाजातील राजकीय पक्ष, संघटनांची बैठक झाली. यावेळी संबंधित हिंसाचारास मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे कारणीभूत असून, त्यांना अटक करण्याची मागणी उपस्थितांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक विश्‍वास नांगरे पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार पाटील यांनी ठोस पुरावे देण्याची मागणी करत एक समिती स्थापन करून त्याचा अहवाल देण्यास सांगितले होते. त्यानुसार, 10 जणांची समिती स्थापन झाली. 

दरम्यान, संबंधित समितीने 10 दिवस भीमा कोरेगाव येथील 500 हून अधिक दोन्ही समाजामधील नागरिकांची भेट घेतली. त्यामध्ये पीडित, रिक्षा चालकापासून ते वकील, पत्रकार, शेतकरी या सर्वांचा समावेश होता. त्यांच्याशी बोलून 31 डिसेंबर 2017 पूर्वी, 1 जानेवारी रोजी आणि त्यानंतर घडलेल्या घटनांबाबतची इत्थंभूत माहिती घेतली. त्यामध्ये काही हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भीमा कोरेगाव हिंसाचाराचा पूर्वनियोजित कट केला होता. त्यानुसार नंतर हिंसाचारही घडवून आणण्यात आल्याचे अहवालात नमूद केले आहे. 

संबंधित अहवालाबाबत डॉ. धेंडे म्हणाले, ""भीमा कोरेगाव हिंसाचाराबाबतचा अहवाल मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांनी त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांमार्फत पूर्वनियोजितपणे हिंसाचाराचा कट रचला. त्यानुसार हिंसाचार घडवून आणल्याचे चौकशीमध्ये आढळले. मात्र, हा अहवाल वास्तवदर्शी असल्याने पोलिसांनी तो स्वीकारला नाही.'' दरम्यान, या प्रकरणी नांगरे पाटील व ग्रामीण पोलिस अधीक्षक संदिप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. 

"" डॉ. धेंडे यांची समिती ही सरकारी नव्हे, तर खासगी होती. त्यांनी दिलेल्या अहवालातून मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांच्यावर हिंसाचारप्रकरणी केलेले आरोप चुकीचे आहेत. 4 एप्रिल रोजी न्यायालयाने पोलिसांच्या तपास ग्राह्य धरून मिलिंद यांना जामीन मंजूर करून त्यांची सुटका केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही हाच निर्णय कायम ठेवला. त्यामुळे न्यायालयावर विश्‍वास ठेवला पाहिजे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने स्वतंत्र आयोग नेमला आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.'' 
- डॉ. गजानन एकबोटे, मिलिंद एकबोटे यांचे बंधू. 

भीमा कोरेगाव समन्वय समितीच्या अहवालातील मुद्दे 
* भीमा कोरेगाव विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांना विरोध दर्शविण्यासाठी पूर्वनियोजित कट 
* वढू येथील घटनेतून दोन समाजात जाणीवपूर्वक तणाव निर्माण केला 
* 16 डिसेंबर 2017 - कौस्तुभ कस्तुरेच्या फेसबुकवर 1 तारखेला दंगल सदृश ऐतिहासिक घटनेचा उल्लेख. 
* 26 डिसेंबर --------- - शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे व अनिल काशीद यांनी विजयस्तंभ विरोधी पत्रके काढली 
* 27 डिसेंबर ------- - भीमा कोरेगाव शौर्य गाथा व वढू गावातील इतिहास खोटा - मिलिंद एकबोटेंची पत्रकार परिषदेत माहिती 
* 29 डिसेंबर --------- ग्रामपंचायतीचा ठराव, हिंदुत्ववादी जमावाने गायकवाड यांच्या फलक, सुरक्षा छत्री व समाधीची नासधूस केली 
* 29 डिसेंबर -------- - सुवेझ हक यांची गायकवाड कुटुंबीयांबरोबर बैठक, 49 जणांविरुद्ध गुन्हे, 7 जण अटक 
* 29 डिसेंबर -------- - पोलिस उपअधीक्षक गणेश मोरे यांच्या गाडीवर दगड मारल्याने तणाव 
* 30 डिसेंबर --------- सोनाई हॉटेल व बिअर बारमध्ये मिलिंद एकबोटे यांची पत्रकार परिषद 
* 30 डिसेंबर ---------- एकबोटे यांची कार्यकर्त्यांबरोबर 1 जानेवारी काळा दिवस पाळण्याचा, गावातील दुकाने बंद ठेवण्याबाबत चर्चा 
* 30 डिसेंबर --------- संभाजी भिडे यांची 1 जानेवारीला सभा ठेवल्याचा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल 
* 30 डिसेंबर ---------- भीमा कोरेगाव ग्रामपंचायत ठराव - 1 जानेवारीला बंद, बंदबाबतचे पत्र पोलिसांना दिले 
* 30/31 डिसेंबर ---------- हिंदुत्ववादी संघटनेकडून चिथावणीखोर संदेश व्हायरल 
* 31 डिसेंबर ---------- शिक्रापूर, भीमा कोरेगाव, लोणीकंदमधील व्यावसायिक, रिक्षाचालकांना बंद ठेवण्यासाठी धमक्‍या 
* 31 डिसेंबर -------- - रामदास आठवले यांचे वढू येथे संभाजी महाराज व गोविंद गायकवाड समाधी स्थळास अभिवादन 
* 31 डिसेंबर -------- - आठवले यांच्या अभिवादनानंतर संभाजी महाराजांच्या समाधीवर गोमूत्र टाकून पूजा 
* 1 जानेवारी 2018 - गावात दंगल सदृश वातावरण, रहिवाशांनी राजकुमार बडोले यांना याबाबत माहिती दिली 
* 1 जानेवारी --------- - सगळीकडे दुकाने बंद, लाठ्या-काठ्या घेतलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या "हिंदू राष्ट्र बनाके रहेंगे'च्या घोषणा 
----------------------- 

काय घडले 1 जानेवारी 2018 रोजी 
* भगवे झेंडे हाती घेतलेले हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते दुचाकीवरून फिरत होते. 
* वढू येथून 300 जणांचा जमाव भीमा कोरेगावच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. 
* शिक्रापूरकडून निळा झेंडा लावून येत असलेल्या वाहनाची तोडफोड, गाडीतील लोकांना अमानुषपणे मारहाण 
* सकाळी 9 वाजता सणसवाडी चौकात 300 हिंदुत्ववादी जमावाने गाड्यांना अडवून तोडफोड केली 
* आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पोलिस अधिकारी गणेश मोरे, सर्जेराव पाटील, रमेश गलांडे, सुहास गलांडे यांना माहिती दिली, मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. 
* कटरने स्प्रे पंपावर स्क्रॅच करुन ते गाडीवर मारून गाड्या पेटवल्या 
* गाड्या जळत असलेल्या ठिकाणी मंत्री राजकुमार बडोले, डीवायएसपी प्रत्यक्षदर्शी 
* पोलिसांनी आंबेडकरी कार्यकर्त्यांना मारहाण. 
* मारहाणीबाबत स्थानिकांनी पोलिस ठाण्यात कळविले, पोलिस कर्मचाऱ्यांनीही दुर्लक्ष केले 
* आसपासच्या गावातील हिंदुत्ववादी तरुणांकडून आंबेडकरी अनुयायांना जबर मारहाण 
* व्यंकटेश शुगर मिलच्या कामगारांना निळे झेंडे लावले म्हणून मारहाण 
* हजारोंचा जमाव गावात आला, "घाबरू नका, पोलिस आपल्या बाजूने आहेत' अशी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा 
* कोंढापुरी गाव, चाकण चौक, सणसवाडी, मलठण फाटा या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गाड्यावर दगडफेक केली 
* मंत्री दिलीप कांबळे यांच्या गाडीवरही दगडफेक, त्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. जादा पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी केली 
* भगवे झेंडे घेऊन कोरेगाव भीमाच्या दिशेने निघालेल्या रॅलीला पोलिसांचे संरक्षण 
------------------- 
* 2 जानेवारी - पोलिसांनी जमावबंदीचा आदेश लागू केला 
* जानेवारी - सकाळी 10 वाजता पेरणे फाट्याजवळ हिंदुत्ववादी जमावाने आंबेडकरी कार्यकर्त्यांचे फ्लेक्‍स फाडले 
------------------------------ 
अहवालामध्ये करण्यात आलेली मागणी 
* 1 जानेवारीला बंदचा ठराव करणाऱ्या ग्रामपंचायतींवर गुन्हे दाखल करावेत 
* संशयितांचे मोबाईल जप्त करून त्यांना त्वरित अटक करावी 
* संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, भंडारे, अनिल घुगे, कौस्तुभ कस्तुरे, विद्याचरण पुरंदरे यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये अटक करावी. 
* हिंसाचार घडविणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक करावी 
* सीसीटीव्ही फुटेज बघून चौकशी करावी 
* स्थानिक बड्या नेत्यांची भूमिका संशयास्पद, त्यांच्याविरुद्धही गुन्हे दाखल करावेत 
* हिंसाचाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या डीवायएसपी गणेश मोरे, रमेश गलांडे, सर्जेराव पाटील यांच्यासह दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांचे निलंबन करावे. 
* भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) तपास करण्यात यावा. 
* जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटना टाळण्यासाठी राज्यस्तरीय सलोखा समिती तयार करावी 
* गुन्हा दाखल झालेले सर्व संशयित आरोपी स्थानिक आमदाराचे नातेवाईक असून, त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
* हिंसाचारानंतर घाबरुन गाव सोडलेल्यांच्या रोजगाराची व निवासाची व्यवस्था करावी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com