#PuneBRT बीआरटी आवश्‍यकच; धरसोडपणा नको

nagar-road-brt
nagar-road-brt

स्वारगेट - शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) हा प्रकल्प आवश्‍यक आहेच; परंतु त्यात धरसोड न करता प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत शहरातील बहुतांश नागरिक आणि तज्ज्ञांनी व्यक्त केले. महापालिकेने याबाबत भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

बीआरटीवर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले असले तरी, प्रवाशांच्या हाती काहीच  पडलेले नाही. महापालिकेचे पदाधिकारीही बीआरटीकडे दुर्लक्ष करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर बीआरटीची अवस्था आणि दुरवस्थेचे चित्रण मांडणारी वृत्तमालिका ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली. त्यात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत बीआरटीच्या बाजूने कौल दिला  आहे. 

जगन्नाथ शिवतारे (शुक्रवार पेठ) - बीआरटी योजना शहरात अपयशी ठरत असली तर, बीआरटीची पुण्यात गरज आहे. कोणीही कुठेही बीआरटीमध्ये लेन तोडून वाहने आणतात. त्यामुळे अपघात होण्याची संख्या वाढली आहे.

संजय शितोळे (बिबवेवाडी) - बीआरटी योजना चांगली आहे; पण त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे झालेली नाही. त्यातील नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण  बीआरटी चालकांना दिले पाहिजे. बीआरटी ज्या अवस्थेत सध्या आहे, त्यात तिची विश्‍वासाहर्ता हरवली आहे. 

पुष्पलता लाड (कात्रज) - स्वारगेट-कात्रज बीआरटी प्रकल्प सुरू झाला तेव्हा मी बीआरटीने प्रवास करीत असे, पण बीआरटी मार्गातील बसची संख्या सध्या कमी झाली आहे. त्यामुळे नाइलाजाने आता खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. बीआरटीची गरज आहे, पण योग्य प्रकारे नियोजन करून तिची अंमलबजावणी केली पाहिजे.

दिलीप जगताप (कात्रज) - बीआरटीच्या नव्या थांब्यांपर्यंत पोचणे प्रवाशांना अडचणीचे ठरत आहेत. त्याचा प्रशासनाने विचार केला नव्हता का? वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी ते योग्य ठिकाणी उभारले पाहिजे. बीआरटी  मार्गांवर फक्त बसला परवानगी द्यायला हवी. 

निशा मुटकुळे (नवी पेठ) - खासगी वाहनांची संख्या कमी होईल आणि वाहतूक कोंडीही दूर होईल, या उद्देशाने सुरू केलेली बीआरटी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही नागरिकांना काहीच उपयोग झालेला नाही.

दीपाली मादळे (अरण्येश्‍वर) - बीआरटीच्या नावाखाली नागरिकांच्या पैशांची महापालिकेने अक्षरश- उधळपट्टी केली आहे. मेट्रो आणि बीआरटी यांचा कसा समन्वय साधला जाणार, असा प्रश्‍न पुण्यातील नागरिकांना पडला आहे. 

बीआरटीला नवसंजीवनीची गरज
रेनबो बीआरटीस आता नवसंजीवनी देण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच, बीआरटी मार्गांमध्ये खासगी वाहनांना बंदी घालावी लागेल. बस स्थानकांची मोठ्या प्रमाणात डागडुजी करावी लागणार आहे. बीआरटी मार्गासाठी रोड मेंटेनन्स व्हॅन सुरू ठेवणे, आयटीएमएस चालू करणे आणि मी कार्डची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. मेट्रोच्या तुलनेत बीआरटीची किंमत माफक असून, उपयुक्तताही जास्त आहे, असे मत वाहतूक तज्ज्ञ प्रांजली देशपांडे यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com