जनगणना दोन टप्प्यांत होणार

Census
Census

पुणे - जनगणना २०२१ ही दोन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात घरांची गणना आणि राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर अद्ययावत करण्याचे काम होणार आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२० दरम्यान ४५ दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात ९ ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान लोकसंख्येची गणना केली जाईल.

जनगणना मोहिमेच्या तयारीसाठी येथील ‘यशदा’ प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर्सच्या प्रशिक्षणाला प्रारंभ झाला. ११ ते १६ डिसेंबरपर्यंत आणि १८ ते २३ डिसेंबर या कालावधीत हे प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. सर्व जिल्हे आणि महापालिकांमधील १३७ मास्टर ट्रेनर्स आणि गोव्यामधील चार मास्टर ट्रेनर्सना राष्ट्रीय प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यातही सुमारे साडेपाच हजार क्षेत्रीय प्रशिक्षकांनाही जानेवारीत प्रशिक्षण देण्यात येईल. 

प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्राचे उद्‌घाटन जनगणना संचालिका रश्‍मी झगडे यांच्या हस्ते झाले. भारताची जनगणना हे जगातील सर्वात मोठे प्रशासकीय कार्य आहे. सर्व प्रशिक्षणार्थींनी जनगणनेत उत्साहात भाग घ्यावा व माहिती पुढील टप्प्यांमध्ये चांगल्या प्रकारे पोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

जनगणनेचा इतिहास
ही जनगणना अधिनियम १९४८ च्या कायदेशीर तरतुदीनुसार होत आहे. परंतु पहिली जनगणना १८७२ मध्ये झाली. त्यानंतर १८८१ मध्ये देशात सर्वप्रथम एकाचवेळी जनगणनेंतर्गत माहिती संकलित केली. त्यानंतर प्रत्येक दहा वर्षांनी जनगणना घेण्यात येत आहे. जनगणना २०२१ ही या शृंखलेतील १६ वी तर स्वातंत्र्योत्तरची आठवी जनगणना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com