पुणे - कौटुंबिक वादातून विभक्त झालेली किंवा पटत नसल्याने वेगवेगळे राहात असलेली जोडपी एकमेकांना त्रास देण्यासाठी मुलांचा शस्त्रासारखा वापर करीत असल्याचे प्रकार येथील कौटुंबिक न्यायालयात घडत आहेत.
ताबा असलेला पालक आयुष्यातील सुख-दुःखाचे क्षण मुलांबरोबर घालवत असतात. मात्र, दुसऱ्या पालकाला मुलांचा सहवास लाभत नाही. आईकडेच मुलांचा ताबा असल्याचे प्रमाण ८० टक्क्यांच्या घरात आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या वडिलांना त्यांचा ताबा हवा असल्यास त्यांना हिंदू विवाह कायद्यानुसार न्यायालयात अर्ज करण्याची मुभा आहे. आईदेखील अशा प्रकारचा अर्ज करू शकते. सध्या पती-पत्नीतील वादामुळे सूड उगवण्यासाठी म्हणून मुलांचा वापर करण्यात येत आहे.
विविध कारणे सांगत मुद्दाम मुलांना भेटू न देणे, दुसऱ्या पालकाविषयी चुकीची माहिती देऊन मुलांमध्ये त्यांच्याबद्दल द्वेषाची भावना निर्माण करण्याचे प्रकार केले जात आहेत. तसेच मुलांना भेटण्याची इच्छा नाही; पण केवळ पती किंवा पत्नीला त्रास देण्यासाठी म्हणून मुलांना भेटण्याचा अर्ज केला जात आहे. ताबा असलेल्या पालकाला मान्य होणार नाहीत, अशा मागण्या त्या अर्जाद्वारे केल्या जात आहेत.
हेही वाचा - तानाजीच्या निमित्ताने सिंहगड चर्चे
त्याआधारे संबंधित पालकाला न्यायालयाच्या खेट्या मारायला लावल्या जातात. अखेर अर्ज मंजूर झाल्यानंतर मुलांना भेटायला यायचेच नाही, अशा अनेक घटना न्यायालयात घडल्या आहेत. मात्र, न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका आदेशामुळे हे प्रकार थांबण्याची शक्यता आहे. मुलांची भेट टाळल्यास पालकांना तीन हजार रुपये दंड करण्यात येईल, असे आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिले.
मुलं हेच ताबा असलेल्या पालकासाठी सर्वकाही आहे, असं लक्षात आल्यानंतर आपले विविध हेतू साध्य करण्यासाठी मुलांचा ताबा मागण्यात येतो. असे प्रकार सर्रास होत आहेत. अशीच एक केस मी ही हाताळली होती.
- ॲड. मीनाक्षी डिंबळे, कौटुंबिक न्यायालय
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.