खेळा मुलांनो, आता मार्कांसाठीही खेळा !

खेळा मुलांनो, आता मार्कांसाठीही खेळा !

पुणे - शाळकरी विद्यार्थ्यांनो, तुम्ही क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत असाल, तर अभ्यास करता आला नाही, अशी खंत तुम्हाला राहणार नाही. कारण सहावीपासून बारावीपर्यंत जिल्हा, विभाग, राज्यस्तरावर सरकारने निर्देशित केलेले खेळ खेळला असाल आणि त्यात प्रावीण्य मिळविले, तर त्याचे जादा गुण तुम्हाला दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मिळणार आहेत. याशिवाय एनसीसी आणि स्काउट-गाइडमधील विद्यार्थ्यांनादेखील जादा गुण दिले जाणार आहेत.

 राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज नव्या नियमांची घोषणा केली. यापूर्वी दहावी आणि बारावीत असताना क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविले, तरच त्याचे गुण दिले जात होते. एनसीसी आणि स्काउट गाइडमधील विद्यार्थ्यांना हे गुण दिले जात नव्हते. आता या वर्षी मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांपासून जादा गुण देण्याची नवी पद्धत लागू होईल. खेळांमध्ये नैपुण्य मिळविणारा कोणताही विद्यार्थी या सवलतींपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना शाळांना करण्यात आली आहे.

नव्या नियमांचा लाभ मिळण्यासाठी एक अट मात्र मंडळाने घातली आहे. विद्यार्थ्याने सहावी ते नववी क्रीडा स्पर्धांमध्ये   भाग घेऊन त्यात नैपुण्य मिळविले असेल, तर त्याचे गुण मिळविण्यासाठी दहावीत असताना त्या क्रीडाप्रकारामध्ये केवळ सहभागी होणे आवश्‍यक आहे. एखादा विद्यार्थी सहा ते नववीमध्ये असताना खेळला नाही आणि दहावीमध्ये एखाद्या स्पर्धेत प्रावीण्य मिळविले असेल, तरीही त्याला जादा गुण मिळणार आहेत. अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हीच पद्धत अवलंविली जाणार आहे.

दहावी, बारावीमध्ये शिकत खेळाडू विद्यार्थी हा एकापेक्षा अधिक स्पर्धेत वा एनसीसी, स्काउट गाइड यांच्या शिबिरांमध्ये सहभागी झाला असेल, तर त्याला त्यांच्या सर्वोत्तम प्रावीण्याचे गुण दिले जातील. जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावरील स्पर्धेत प्रावीण्य मिळविणारा विद्यार्थी ही सवलत मिळण्यास पात्र असेल. मात्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्याला जादा गुण मिळणार आहेत. मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

शिफारस ३० एप्रिलपर्यंत
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी खेळाडूंचे प्रस्ताव शैक्षणिक वर्षातील एक जानेवारी ते पाच एप्रिल या काळात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे सादर करायचे आहेत. अधिकाऱ्यांनी त्याची छाननी करून योग्य खेळाडूंना सवलतीचे गुण देण्याची शिफारस ३० एप्रिलपर्यंत विभागीय शिक्षण मडळांकडे पाठवायची आहे. विद्यार्थी एखाद्या क्‍लबकडून स्पर्धेत सहभागी झाला असेल आणि त्याने नैपुण्य मिळविले असेल, तर त्याला सवलतीचे गुण मिळणार नाहीत, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com