सन्मानजनक तोडगा निघाला नसल्याचे कारण
पिंपरी : काँग्रेस पक्ष तीन जागांवर आघाडी करण्यास तयार असताना राष्ट्रवादी काँग्रेस 20 जागा देण्यावर ठाम होती. सन्मानजनक तोडगा न निघाल्याने आम्ही नम्रपणे आघाडीचा प्रस्ताव नाकारत आहोत, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसूध्ये मंगळवारी रात्री उशिरा बैठक झाली या बैठकीत सन्मानजनक तोडगा निघाला नाही. 'सकाळ'च्या बुधवारच्या (ता.1) अंकात 'काँग्रेस-राष्ट्रवादीत बिघाडीची शक्यता' ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. आघाडी तुटल्याने 'सकाळ'च्या वृत्तावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
भारतीय काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे तर राष्ट्रवादी हा प्रादेशिक पक्ष आहे. यामुळे काँग्रेसने सुरवातीला निम्म्या जागांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडे केली. मात्र राष्ट्रवादीने योग्य प्रस्ताव सादर करावा, असे राष्ट्रवादीचे म्हणणे असल्याने 40 जागांचा प्रस्ताव काँग्रेसने राष्ट्रवादीला दिला. मात्र तेवढ्याही जागा राष्ट्रवादी काँग्रेस देण्यास तयार नव्हती. मात्र धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी नको म्हणून काँग्रेसने अखेर 30 जागांची मागणी केली. मात्र राष्ट्रवादी तेवढ्याही जागा देण्यास तयार नव्हती.
तर राष्ट्रवादीच्या म्हणण्यानुसार काँग्रेसचे 14 नगरसेवक महापालिकेत होते. आता फक्त दोनच नगरसेवक काँग्रेसमध्ये उरले आहेत. तरीदेखील आम्ही त्यांना मोठ्या मनाने 20 जागा देण्यास तयार होतो. मात्र काँग्रेस 30 जागांवर कायम राहिली. आघाडीबाबत आजही आम्ही आशावादी आहोत.
'धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी नको आणि त्याचा फायदा जातीयवादी पक्षांना होऊ नये म्हणून आम्ही आघाडी करण्यासाठी प्रयत्नशील होतो. आमची शेवटपर्यंत आघाडी करण्याबाबत मानसिकता होती आणि आहे. राष्टवादी भूतकाळातच रममाण आहे. वर्तमानाचा अद्यापही त्यांना अंदाज आलेला नाही हे चर्चेवरून दिसते. अत्यंत नम्रतेने राष्ट्रवादीचा आघाडीचा प्रस्ताव आम्ही नाकारत आहोत. प्रदेश पातळीवरून आघाडीबाबत आम्हाला अधिकार दिले असूनही त्यांना आमच्या भावना कळवून आघाडी होणे शक्य नसल्याचे सांगू.''
|