मावळात पावसामुळे विसर्ग सुरूच 

मावळात पावसामुळे विसर्ग सुरूच 

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्‍यात पावसाचा जोर कायम असून, पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी-जास्त करण्यात येत आहे. वडिवळे पूल वगळता इतर पुलांवरून सध्या वाहतूक सुरू आहे. आंदर मावळात बोरवली गावाजवळ ठोकळवाडी धरणाचे पाणी वडेश्‍वर-खांडी रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळित झाली.
 
तालुक्‍यात गुरुवारी (ता. 8) सकाळी संपलेल्या चोवीस तासांत लोणावळा येथे 102, कार्ला येथे 131, पवनानगर येथे 101, कामशेत येथे 68, वडगाव येथे 18, तळेगाव दाभाडे येथे 27, वडिवळे 94 व शिवणे येथे 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुरुवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी पडत होत्या. त्यामुळे पवना धरणातून 10 हजार 900 क्‍युसेक, वडिवळे धरणातून 1 हजार 256, आंद्रा धरणातून 4 हजार 100, ठोकळवाडी धरणातून 2 हजार 640, जाधववाडी धरणातून 109 तर कासारसाई धरणातून 400 क्‍युसेक विसर्ग सुरू होता. 

विसर्ग काही प्रमाणात वाढला असला, तरी वडिवळे पूल वगळता इतर पुलांवरील वाहतुकीवर परिणाम झाला नसल्याची माहिती नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली. ठोकळवाडी धरणातील पाणी बोरवली गावाजवळ रस्त्यावर आल्याने वडेश्‍वर-खांडी रस्त्यावरील वाहतूक मात्र विस्कळित झाल्याचे त्यांनी सांगितले. 

14 वर्षांनंतर मोठा विसर्ग... 
मावळ तालुक्‍यातील महत्त्वाच्या पवना धरणात 94 टक्के पाणीसाठा झाला असून, धरण परिसरात आतापर्यंत दोन हजार 870 मिलिमीटर पाऊस झाला आहे. पाऊस जास्त झाल्याने 2005 नंतर या वेळी प्रथमच धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. वडिवळे धरणात 96.28 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरात आतापर्यंत तीन हजार 321 मिलिमीटर पाऊस झाला आहे. आंद्रा धरण शंभर टक्के भरले असून सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे. कासारसाई धरण 94 टक्के तर जाधववाडी धरण शंभर टक्के भरले आहे. 

नुकसानीचे पंचनामे होणार... 
गेल्या पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे भात पिकाला धोका निर्माण झाला आहे. तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी याबाबत सांगितले, की खाचरात सलग आठ दिवस पाणी साचून राहिल्यास पीक पिवळे पडण्याचा धोका असतो. तो लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या खाचरातील पाणी काढून दिल्यास पिकाला धोका होणार नाही. 

पाण्याचा निचरा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शिफारस केल्याप्रमाणे खताचा दुसरा हप्ता द्यावा. पुरामुळे नद्या तसेच ओढे, नाल्याशेजारील पिकाचे काही ठिकाणी नुकसान झाल्याच्या तक्रारी आहेत. कृषी पर्यवेक्षक व कृषी साहाय्यकांना या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com