येरवडा : आधीच कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण असते. त्यातच अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत तास न् तास वाट पहावी लागते. मात्र, आता ही परिस्थिती बदलत आहे. शहरातील निवडक स्मशानभूमीतील विद्युत व गॅस दाहिन्यांसह गोवऱ्या व लाकडांच्या मदतीने पारंपारिक पद्धतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची महापालिकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे कमी वेळेत अंत्यसंस्कार तर होतीलच शिवाय पारंपरिक पद्धतीचा वापर केल्याने काहींना मानसिक समाधानही मिळेल.
पुण्यात कोरोनामुळे दररोज सुमारे शंभर जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे येरवड्यातील अमरधाम व नायडू येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइकांना चार ते पाच तासांपेक्षा अधिक वेळ प्रतिक्षा करावी लागत होती. त्यातच ससूनमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी जागाही कमी पडू लागली. त्यामुळे शुक्रवारपासून (ता. १६) वैकुंठसह शहरातील निवडक स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीनिवास कुंदुल यांनी दिली.
वैकुंठमधील बारा पायर्स पारंपरिकपणे पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी चोवीस तास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासह शहरातील इतर स्मशानभूमीतही अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्यांना रांगेत थांबावे लागणार नाही, असेही कुंदुल यांनी सांगितले.
''अमरधाम स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीवर वर्षभरात इतर सहकाऱ्यांच्या मदतीने केवळ कोरोनामुळे मृत्यू झालेल्या दहा हजारांपेक्षा अधिक मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. घरी पत्नी, दोन मुलगे व आई - वडील आहेत. त्यामुळे थोडी काळजी वाटते. अंत्यसंस्कार करण्यासारखी कोणतीच सेवा मोठी वाटत नाही.''
- श्रीकांत स्वामी, विद्युत दाहिनी ऑपरेटर, येरवडा स्मशानभूमी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.