आगीच्या घटनेनंतरही सुरक्षेकडे काणाडोळा

आगीच्या घटनेनंतरही सुरक्षेकडे काणाडोळा

पुणे -  उरुळी देवाची येथे बेकायदा उभारलेल्या साडीच्या शोरूमला आग लागून पाच जणांचा जीव गेल्यानंतरही महापालिकेने ही घटना गांभीर्याने घेतलेली नाही. येथील कापड दुकानांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना न करणाऱ्या दुकानदारांकडे महापालिकेने साधी विचारणाही केलेली नाही. अहवाल मिळाल्यानंतर कारवाई सुरू होईल, असे उत्तर देत महापालिकेच्या अग्निशामक दलाने याकडे काणाडोळा केल्याचे समोर येत आहे. 

उरुळी देवाची येथील राजयोग या साडीच्या दुकानाला आग लागून पाच कामगारांचा मृत्यू झाला होता. दुकानमालकाच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून आढळून आले होते. परिणामी, फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कापड दुकाने, त्यांची बांधकामे आणि येथील कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आला आहे. या दोन्ही गावांत कापड बाजारपेठ विस्तारली असून, ग्राहकांचीही वर्दळ वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रामुख्याने आगीच्या घटना रोखण्यासाठी आग्निशमन यंत्रणा आवश्‍यक आहे; परंतु येथील दुकाने आणि गोदामांमध्ये तशी यंत्रणा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

आगीत पाच जणांचा जीव गेल्यानंतर महापालिका आणि कामगार आयुक्तालय येथील बेकायदा व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारतील, अशी अपेक्षा होती. मात्र, आगीच्या घटनेला पाच दिवस उलटल्यानंतरही या यंत्रणांनी पावले उचलली नाहीत. त्यामुळे कामगारांच्या जिवाशी खेळणाऱ्या व्यावसायिकांना कोणाचेही भय राहिले नसल्याचे चित्र आहे. 

उरुळी देवाची येथील आगीच्या घटनेचा तपास झाला आहे. त्यानंतर तेथील दुकाने, त्यांचे स्वरूप आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना यांचा एकत्रित अहवाल मागविला आहे. तो उपलब्ध झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल. 
- प्रशांत रणपिसे, प्रमुख, अग्निशामक दल 

‘कामगारांना वाचवण्याचे प्रयत्नच नाही’
उरुळी देवाची येथील साडीच्या गोदामास आग लागल्याची माहिती कामगारांनी कळवूनही दुकान मालकाने आग विझविण्यासाठी, आतमधील पाच कामगारांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत, असे सांगत पाचही जणांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांनी केला आहे. आगीमध्ये राकेश सुखदेवजी रियाड, सूरज परुजी शर्मा, राकेश बुगारम मेघावल, धर्मराज तुकाराम बडियासर, धीरज ओमप्रकाश चांडक या पाच तरुणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, पाचही जणांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.  बाणेर येथे राहणाऱ्या सनदी लेखापाल पवन शर्मा यांचा मेव्हणा सूरज शर्मा याचाही या आगीमध्ये मृत्यू झाला. पवन शर्मा म्हणाले, ‘‘दुकानामध्ये आग लागल्यानंतर एका कामगाराने दुकानाच्या मालकास मोबाईलवरून माहिती दिली होती. दुकान मालकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन, पाचही जणांचे प्राण वाचविण्याची गरज होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यामुळे हा प्रकार संशय निर्माण करणारा असल्याचे शर्मा यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com