#CyberCrime सायबर पोलिस ठाणे अद्यापही ‘ऑफलाइन’

#CyberCrime सायबर पोलिस ठाणे अद्यापही ‘ऑफलाइन’

पुणे - बंगळूरपाठोपाठ ‘आयटी हब’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या पुणे शहराला सायबर गुन्हेगारीचा फटकाही तितक्‍याच झपाट्याने बसत आहे. गेल्या साडेचार वर्षांत तब्बल १२ हजारांहून अधिक सायबर गुन्ह्यांबाबतचे अर्ज पोलिसांकडे आले आहेत. मात्र, सायबर गुन्हेगारीवर मात करण्यासाठी स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे अद्यापही कागदावरच आहेत.

हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क, झेन्सॉर, आयबीएम यांसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामवंत आयटी कंपन्या पुण्यामध्ये आहेत. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात शहराचा नावलौकिक देशभरात आहे. परंतु, याच शहरामध्ये सर्वाधिक सायबर गुन्ह्यांचीही नोंद होत आहे. नागरिकांकडून ऑनलाइन, मोबाईल बॅंकिंग, डेबिट/क्रेडिट कार्डचा वाढता वापर आणि दैनंदिन कामासाठी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. याचा फायदा घेत सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणुकीपासून विविध प्रकारचे गुन्हे करत आहेत. कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम स्वीचवर (सर्व्हर) सायबर हल्ला चढवून ९४.४२ कोटी रुपयांच्या आर्थिक लुटीची घटना याच शहरात घडली. या पार्श्‍वभूमीवर सायबर पोलिस ठाण्यांची गरज निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हानिहाय सायबर पोलिस ठाणे सुरू करण्यासंदर्भात नोव्हेंबर २०१६ मध्ये घोषणा केली होती. त्यानुसार पुण्यामध्ये दोन वर्षांपूर्वी सायबर पोलिस ठाण्यांसाठी प्रयत्नही करण्यात आले. मात्र, ते कागदावरच राहिले आहेत.

सायबर पोलिस ठाणे का?
एखाद्याची बदनामी करणे, आर्थिक फसवणूक, दमदाटीपर्यंत सायबर गुन्ह्यांचे प्रकार घडत होते. मात्र, मागील काही वर्षांत थेट सायबर हल्ल्यापर्यंत हे प्रकार गेले आहेत. पुणे पोलिसांचा ‘सायबर व आर्थिक गुन्हे शाखा’ हा विभाग सायबर गुन्ह्यांबाबत काम करत आहे. मात्र, वाढत्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची गरज आहे. त्यासाठी पुरेसे व प्रशिक्षित मनुष्यबळ, भरीव आर्थिक तरतूद आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा समावेश सायबर पोलिस ठाण्याअंतर्गतच मिळू शकेल.

काय होणार फायदे?
 सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींची थेट नोंद घेणे शक्‍य
 सर्व सायबर गुन्ह्यांच्या तपासाला वेग येणार
 सायबर गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल
 गुन्हेगारीबाबत जनजागृतीवर भर देता येईल 
 पोलिस ठाण्यांवरील ताण कमी होण्यास मदत

आमच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगाराने कंपनीचा महत्त्वपूर्ण डेटा चोरी करून २२ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात मार्च २०१८ मध्ये मी फिर्याद दिली. आम्ही दिलेल्या पुराव्यांच्या आधारे सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फसवणुकीचा सविस्तर अहवाल संबंधित पोलिस ठाण्याला दिला. मात्र, सात महिने उलटले तरीही आरोपीवर कारवाई केली नाही. 
- रिशिता व्होरा, एचआर, रेमीडी

पुण्यासाठी सायबर पोलिस ठाणे प्रस्तावित आहे. दोन महिन्यांमध्ये हे काम मार्गी लागेल. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
- डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com