जिल्ह्यात धरणे पाणीदार

डिंभे धरण (ता. आंबेगाव) - पावसामुळे झालेला २४.३६ टक्के पाणीसाठा.
डिंभे धरण (ता. आंबेगाव) - पावसामुळे झालेला २४.३६ टक्के पाणीसाठा.

घोडेगाव - आंबेगाव तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागात गेले चार दिवस जोरदार पाऊस पडत आहे. आहुपे, भीमाशंकर व पाटण खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने डिंभे धरणात शुक्रवारी सकाळी सातपर्यंत २४.३६ टक्के (३.०४ टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. 

आंबेगाव, जुन्नर व सोलापूर जिल्ह्याला या धरणातील पाण्याचा लाभ होतो. आदिवासी भागातील ओढे, नाले भरून वाहत आहे. बुब्रा व घोड नदी दुथडी भरून वाहत आहे. ७ जुलै रोजी धरणात ८.८८ टक्के पाणीसाठा होता. सहा दिवसांत धरणातील साठ्यात १५.४८ टक्के वाढ झाली आहे. डिंभे धरण क्षेत्रात ३३६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पोखरी घाटातून दिसणारा गोहे पाझर तलाव भरून वाहत आहे. यामुळे घोड नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. आदिवासी भागातील भातलावणी अंतिम टप्प्यात आहे. ६५०० हेक्‍टर क्षेत्रापैकी ५५०० हेक्‍टर क्षेत्रात भातलावणी पूर्ण झाली आहे. या आठवड्यात भातलावणी पूर्ण होईल.

भातखाचरे तुडुंब भरल्यामुळे भातासाठी उपयुक्त आहे. बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग या पिकांच्या १०० टक्के पेरण्या झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संजय विश्वासराव यांनी दिली. तालुक्‍यात इतर पर्जन्यमापक केंद्रांवर पडलेला एकूण पाऊस पुढीलप्रमाणे - घोडेगाव- १७१.४० मिमी., मंचर- १५८ मिमी., पारगाव- १७८.३० मिमी., कळंब- १५७ मिमी.

भामा आसखेड ४६ टक्के 
आंबेठाण - खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात आणि भामा आसखेड धरणाच्या बुडीत क्षेत्रात मागील पाच ते सहा दिवसांपासून कोसळत असलेली संततधारेने भामा आसखेड धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या भामा आसखेड धरणात ४७.६५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. २६ जूनपासून धरणात जवळपास १.०१ टीएमसी पाणी जमा झाले असल्याची माहिती धरण प्रशासनाचे भारत बेंद्रे यांनी दिली.

भामा आसखेड हे खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवणक्षमता ८.१४ टीएमसी आहे. आजवर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नसला, तरी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील वांद्रा, गडद, वेल्हावळे, आंभू, आंबोली, शिवे, वहागाव, देशमुखवाडी या गावांसह डोंगररांगात मागील पाच ते सहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. २६ जूनपासून धरणात पाणी जमा होण्यास सुरवात झाली असून, धरणात जवळपास २५ ते ३० किलोमीटर अंतरावरून पाणी जमा होत असते. त्यामुळे धरण साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. सध्याची पाणीपातळी ६६२.६७ मीटर इतकी आहे. एक जूनपासून धरण क्षेत्रात २३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com