टाकीतील पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू 

टाकीतील पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू 

पुणे - रमजान सणाच्या खरेदीसाठी आई-वडील बाहेर गेले असताना नातेवाइकांकडे सांभाळण्यासाठी ठेवलेला चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. कात्रजमधील भिलारेवाडीत मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. गेल्या एक महिन्यात लहान मुलाचा टाकीत बुडून मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे.

पिल्लू ऊर्फ समर सुलतान शेख (वय ३, रा. भिलारेडवाडी, कात्रज), असे त्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील सुलतान शेख (वय २८) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बांधकाम व्यावसायिक अनिल ज्ञानदेव खोपडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल  झाला आहे.

सहायक पोलिस निरीक्षक एस. आर. चिवडशेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रमजानच्या खरेदीसाठी फिर्यादी व त्यांची पत्नी लष्कर परिसरात गेल्या होत्या. त्या वेळी त्यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा समर याला त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या फिर्यादीच्या पत्नीच्या मावशीकडे सांभाळण्यासाठी ठेवले होते. दरम्यान, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास समर हा घरासमोर खेळता-खेळता शेजारीच खोपडे याच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर गेला. 

तेथे इमारतीला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी उघडी होती. तेथे अंधार असल्याने समर टाकीत पडला. फिर्यादीच्या नातेवाईक समरला पाहण्यासाठी घराबाहेर आल्या. त्या वेळी तो दिसला नाही. त्यामुळे त्यांनी तत्काळ टाकीकडे धाव घेतली. तेव्हा समर पाण्यात बुडाल्याचे निदर्शनास आले. अन्य रहिवाशांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

स्वराज नंतर समरचा मृत्यू
बांधकामच्या ठिकाणी सात मे रोजी सायंकाळी सात वाजता मित्रांसमवेत लपाछपी खेळताना स्वराज माधव खवले (वय ११, रा. भिलारेवाडी) याचा इमारतीच्या तळमजल्यावरील टाकीत पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर एक महिन्याने पुन्हा भिलारेवाडीमध्येच समरचा टाकीत पडून मृत्यू झाला. 

बेकायदा बांधकामांचा परिणाम
महापालिकेच्या परवानगीशिवाय कात्रजसह उपनगरांमध्ये बेकायदा बांधकामे केली जात आहेत. तेथे सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे परिसरातील लहान मुलांसह कामगारांचेही जीव जात आहेत. घटना घडल्यानंतरही बेकायदा बांधकामांवर महापालिकेकडून ठोस उपाययोजना केली जात नाही.

अशी घ्या काळजी
  पालकांनी खेळणाऱ्या मुलांवर बारकाईने लक्ष द्यावे   सुरक्षारक्षक नेमण्याची गरज    टाकी, लिफ्टचे डक्‍ट झाकण लावून बंद करावे   धोकादायक ठिकाणी जाळ्या बसवाव्यात    अंधाऱ्या जागी दिवे लावणे

बेकायदा बांधकामांच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे मुलांच्या मृत्यूच्या घटना घडत आहेत. व्यावसायिकांनी सुरक्षेकडे लक्ष द्यावे. पालिकेनेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी.
-एस. आर. चिवडशेट्टी, सहायक पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com