शेतकऱ्यांना मेपर्यंत कर्जमुक्‍तीचा लाभ - नवल किशोर राम

naval-kishore-ram
naval-kishore-ram

कर्जखात्यांत बाराशे कोटी जमा होणार; एप्रिलपासून प्रक्रिया
पुणे - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेचा लाभ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात एप्रिलपासून प्रत्यक्ष रक्‍कम जमा होण्यास सुरुवात होऊन मे अखेरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेल, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

जिल्हाधिकारी राम यांनी गुरुवारी (ता. २७) पत्रकार परिषद घेऊन कर्जमुक्‍ती योजनेची माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे या वेळी उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी राम म्हणाले, राज्य सरकारने जाहीर केलेल्या दोन लाखांपर्यंत कर्जमुक्‍ती योजनेसाठी पुणे जिल्ह्यात एक लाख ४० हजार ९३८ पात्र लाभार्थी शेतकरी आहेत. त्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम सध्या सुरू आहे. जिल्ह्यात आधार प्रमाणीकरणासाठी ‘आपले सरकार केंद्रां’वर आणि बॅंकांमध्ये बायोमेट्रिक मशिन उपलब्ध आहेत. तसेच, रेशन दुकानांमध्ये अडीच हजारांहून अधिक पॉस मशिन उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी पोर्टलवर किंवा प्रसिद्ध झालेल्या यादीत नाव आणि कर्जाची रक्‍कम पाहून या केंद्रांवर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.

जिल्ह्यात बारामती तालुक्‍यातील मोरगाव आणि पुरंदर तालुक्‍यातील सासवड येथे प्रायोगिक तत्त्वावर आधार प्रमाणीकरण करण्यात आले. त्यात काही त्रुटी आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल. शेतकऱ्यांना कोणता त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांची तक्रार येऊ नये, अशा सूचना बॅंकांना दिल्या आहेत. कोणाची तक्रार असल्यास जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राम यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com