सतत बिघाड होणाऱ्या फिडरमध्ये दुरूस्ती करायची मागणी

mahavitaran
mahavitaran

उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन उपविभागाच्या वळती फिडरमध्ये सतत होणाऱ्या बिघाडावर योग्य उपाययोजना करून या भागातील विजग्राहकांच्या समस्या तातडीने सोडविण्यात येणार असल्याची माहिती 'महावितरण'चे मुळशी विभाग कार्यकारी अभियंता आर. एस. बुंदेले यांनी दिली.

'महावितरण'च्या उरुळी कांचन उपविभागातील अनियमित व कमी दाबाने होणारा वीजपुरवठा तसेच  विजबिलांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी उरुळी कांचन उपविभागात शुक्रवारी (ता. 11) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बुंदेले यांनी वरील माहिती दिली. यावेळी महावितरणच्या उरुळी कांचन शाखेच्या सहाय्यक अभियंत्या प्रतिभा जाधव उपस्थित होत्या. 

थेऊर (ता. हवेली) उपविभागातून निघालेला वळती फिडर सुमारे ८५ किलोमीटर अंतरावर पसरलेला असल्याने या फिडरमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या फिडरमध्ये बिघाड झाल्यास सुमारे एक ते दोन दिवस या भागातील विजपुरावठा खंडित होतो. मागील वीस वर्षापासून वळती फिडरवर कृषी व औद्योगिक क्षेत्रातील विजेची मागणी वाढली आहे. सध्या खडकवासला धरणाच्या दोन्ही कालव्याला आवर्तन सुरु असल्याने या भागातील कृषीपंपांसाठी विजेची मागणी वाढली आहे, मात्र गरजेच्या वेळी कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत.

यावेळी बुंदेले म्हणाले,"वळती फिडरवरील ताण कमी  करण्यासाठी या फिडरच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे २० किमी अंतरासाठी दिनदयाळ उपाध्याय कृषी योजनेअंतर्गत २२ केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर थेऊरफाटा येथे बसविण्यात येणार आहे. तसेच यावरुन या भागातील कृषी पंपाना वीजपुरवठा होणार असल्याने त्यावरील जादाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. याचबरोबर वळती फिडरवरील सुमारे ५० रोहित्रे  कोरेगाव मुळच्या उपकेंद्राला  जोडण्यासाठी पुणे-दौंड रेल्वे मार्गाखालून थेऊर फाटा व उरुळी कांचन या दोन्ही ठिकाणी विजप्रवाह वाहक केबल टाकण्यात येणार आहे,  त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे त्या संदर्भातील परवानगी मिळावी म्हणून आमचा पाठपुरावा सुरु आहे. तसेच भविष्यातील विजेची मागणी लक्षात घेऊन उरुळी कांचन उपविभागाअंतर्गत दोन ठिकाणी उपकेंद्रे उभारण्याचा आमचा मानस आहे."

आगामी काळात महावितरणच्या रोहित्रांमध्ये  बिघाड झाल्यास त्यांच्या दुरुस्तीसाठी विभागीय पातळीवर स्वतंत्र एजन्सी नेमण्यात आली आहे. रोहित्र दुरुस्तीच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी 'महावितरण'ने हे पाऊल उचलले आहे.  एखाद्या रोहित्राचा बिघाड झाल्यास त्याचा अहवाल शाखाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्यानंतर विभागीय अधिकारी रोहित्र दुरुस्तीसाठी नेमलेल्या एजन्सीला सूचना करून  नादुरुस्त रोहित्र काढून त्याजागी नवीन रोहित्र  बसविण्याबाबत कार्यवाही करण्याची सूचना देणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com