दिवा प्रतिष्ठानच्या वतीने वीरपत्नीचा सन्मान 

Pune
Pune

पुणे : "देशासाठी प्राण दिलेल्या शहिदांच्या वीरपत्नींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. देशात राजस्थानमध्ये वीरपत्नींची संख्या तुलनेने अधिक आहे. या वीरपत्नींच्या अडचणी सोडविण्यासाठी माझ्या कारकिर्दीत स्वतंत्र व्यवस्था कार्यान्वित केली होती. वीरपत्नींना समाजातील चालीरीती, दबाव या विरोधात आयुष्यभर लढावे लागते,'' अशा शब्दांत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. 

स्व. सौ. मालतीताई माधवराव मानकर यांच्या स्मरणार्थ दिवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मित्र मंडळ यांच्या वतीने परमवीर चक्रविजेते शहीद हवालदार अब्दुल हमीद यांच्या वीरपत्नी रसुलन बीबी यांना "यशोदा पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या.

पुरस्कार वितरण सोहळ्यात शहीद हवालदार अब्दुल हमीद यांचे नातू जमील आलम, ब्रिगेडिअर प्रसाद जोशी (निवृत्त), संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, माजी आमदार उल्हास पवार, प्रतिष्ठानचे प्रमुख आणि नगरसेवक दीपक मानकर, हर्षवर्धन मानकर उपस्थित होते. 

पुरस्काराला उत्तर देताना रसुलन बीबी यांनी पुणेकरांप्रती आदरभाव व्यक्त केला. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. 

देशवासीयांनी एकजूट व्हायला हवे 
"सैनिकांमध्ये कधी जात-पात, धर्म यावरून मतभेद नसतात. देशाला मजबूत बनवायचे असेल, तर देशवासीयांनीदेखील आपापसांतील मतभेद विसरून एकजूट राहायला हवे. देशवासीयांनी एकत्रित होऊन शत्रुविरोधात लढायला हवे,'' अशा शब्दांत शहीद हवालदार अब्दुल हमीद यांचे नातू जमील आलम यांनी भावना व्यक्त केल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com