पुणे - 'भारतीय जनता पक्ष यापुढे कुणाकडूनही रोख स्वरूपात पक्षनिधी स्वीकारणार नाही, असे "पारदर्शक कारभाराचे' अन् कॅशलेसचे आवाहन करणारे मोदीजी जाहीर का बरे करत नाहीत? भाजपला हव्या असतील, तर त्यांनी निवडणुकांसाठीच्या देणग्या धनादेशाच्या स्वरूपात घ्याव्यात. देणग्यांचा ताळेबंदही ठेवावा. यापुढे एक रुपया देणगीही रोखीत न स्वीकारण्याची घोषणा मोदींनी येत्या अर्थसंकल्पात करावी,'' असे आवाहन पत्रकार बरखा दत्त यांनी केले.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजच्या (फिक्की) महिला संघटनेच्या वतीने पहिल्या "शब्दोत्सवा'च्या उद्घाटनाच्या दिवशी, शनिवारी दत्त यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. याच वेळी पत्रकार वीर संघवी, परंजॉय गुहा-ठाकुरता यांचीही मुलाखत झाली. "अडथळे दूर सारताना' या संकल्पनेवर हा साहित्याचा दोन दिवसीय उत्सव घेण्यात येत आहे. या वेळी संघटनेच्या अध्यक्षा विनिता बिंभेट, सबीना संघवी आदी उपस्थित होत्या.
दत्त म्हणाल्या, 'खरेतर, पक्षनिधी रोखीत न स्वीकारण्याचा निर्णय सर्वच पक्षांनी घ्यायला हवा. नोटाबंदीचा मूळ उद्देश काय होता, हेच मला दोन महिन्यांनीही कळू शकलेले नाही. कारण, काळ्या पैशांचा मुद्दा म्हणाल, तर तो कधीच निकालात निघाला आहे. विजय मल्ल्या आणि ललित मोदींसारखे लोक अजूनही देशाबाहेर राहून इंग्लंडमध्ये पार्टी करत बसले आहेत. मग मला सांगा, नक्की कोणाच्या मनात भीती घातली मोदींनी नोटाबंदी करून? फक्त सर्वसामान्यांच्या?''
या वेळी ठाकुरता म्हणाले, 'बातमी आणि दृष्टिकोन / मतं यांतला फरक आपण समजून घ्यायला हवा. बातम्या आणि मनोरंजन यांतील फरकाची रेषा ही अधिकाधिक धूसर होत चालली आहे. टीआरपीमुळे बातम्यांमधील अपेक्षित गांभीर्य कमी होत चालले आहे.''
ऑर्गनाईज्ड ट्रोलिंगचे फुटले पेव !
संघवी म्हणाले, 'सध्या देशात "ऑर्गनाईज्ड ट्रोलिंग'चे पेव फुटले आहे. विशेष म्हणजे यात अनेक राजकीय पक्षांचे लोक हिरिरीने गुंतल्याचे पाहायला मिळते. वाट्टेल त्या खालच्या स्तरावर जाऊन सोशल मीडियात कुणावरही टीका केली जाते. सोशल मीडियाला "फिल्टर' नाही, यामुळे ही समस्या वाढत आहे.'
|