डॉ. आंबेडकर यांचे विचार सर्वव्यापी 

डॉ. आंबेडकर यांचे विचार सर्वव्यापी 

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वव्यापी आहेत. त्यांच्या विचारांना एका चौकटीत बसवू नये... लोकशाही रुजविण्यापासून ते जातिअंतापर्यंत... सर्वांगीण शिक्षणापासून ते समानतेच्या विचारापर्यंत प्रत्येक विचारात डॉ. आंबेडकर यांचे प्रतिबिंब उमटले आहे, असे तरुणाईला वाटते. डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त "सकाळ'ने तरुणाईशी संवाद साधला अन्‌ त्यांच्या विचारविश्‍वात रुजलेले डॉ. आंबेडकर जाणून घेता आले. कोणी त्यांच्या शिक्षणविषयक विचारांवर तर कोणी त्यांच्या "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या त्रिसूत्रीवर भर देत प्रगती आणि विकास साधण्याचा विचार दिला. 

प्रमेय झोडे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणा, हे प्रत्येक राजकीय नेता सांगतो; पण त्यांनी स्वत- हे विचार आत्मसात केले आहेत का? हा प्रश्‍न पडतोच. डॉ. आंबेडकर यांचे सर्वच विचार समाजासाठी गरजेचे आहेत. तो शिक्षणाचा असो वा जातिअंताचा. त्यांच्या विचारांनीच आज देश बदलला आहे. कोणतेही काम हाती घेतले आहे ते पूर्णत्वास न्या, असा विचार डॉ. आंबेडकर यांनी मांडला. हा विचार आधी तरुणांनी आत्मसात करायला हवा. 

अंकुश कावलकर - मानव सेवा, त्यांचा आदर करणे आणि माणसाला माणसाशी जोडणे, हा विश्‍वास डॉ. आंबेडकर यांनी रुजवला. त्यांनी दिलेल्या वाटेवर आपण चालले पाहिजे. माणसांची सेवा करताना जात बाजूला ठेवावी आणि सेवा करत राहायचे, ही गोष्ट सामान्य आयुष्यातही अंगीकारावी. आपण आदर दिला तर आपल्याला आदर मिळतो आणि आपण काम केले तर त्याचे फळ मिळतेच. त्यांच्या याच विचारांनी मला प्रभावित केले आहे. 

विवेक गाटे - डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना ही विशिष्ट वर्गापुरती मर्यादित नाही, तर ती सर्वव्यापी आणि परिपूर्ण आहे. त्यांनी घडविलेल्या या राज्यघटनेचे आपला देश नाही, तर जगातील इतर देशही अनुकरण करत आहेत. त्यांनी कधीही एका विशिष्ट वर्गाचा विचार केला नाही. सर्वसमावेशक भूमिकेतून त्यांनी राज्यघटनेचा विचार केला. या राज्यघटनेतील मूल्ये जीवनात आपण रुजविली पाहिजेत. 

उमेश चव्हाण - समाजशिक्षण आणि लोकशाही ही डॉ. आंबेडकर यांची सूत्रता मला भावते. एक मूल्य, एक मत आणि एक व्यक्ती असा समानतेचा विचार त्यांनी दिला आणि आयुष्यभर जोपासलाही. जातिअंताच्या दृष्टीने त्यांनी कठोर पावलेही उचलली आणि समाजाला एका धाग्यात बांधले. 

जान्हवी विचारे - डॉ. आंबेडकर यांचे विचार आताच्या पिढीला नाहीतर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी गरजेचे आहेत. एका लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर देशात महिला सुरक्षितेचा प्रश्‍न पुन्हा निर्माण झाला असताना डॉ. आंबेडकर यांचे विचारच देशाला वाट दाखवू शकतात. या परिस्थितीत त्यांच्या विचारांची आवश्‍यकता किती प्रकर्षाने जाणवते. 

दर्शना केळकर - डॉ. आंबेडकर यांचे विचार आधी तरुणांनी आत्मसात करायला हवे. त्यांच्या विचारांना जातीच्या चौकटीत न अडकता मुक्त अवकाश द्यावा. हीच त्यासाठी आपण दिलेली खरी पोचपावती असेल. जयंतीपुरते त्यांचे विचार आठवण्यापेक्षा आयुष्य त्यांच्या विचारांनी घडवावे. 

पूजा यादव - समानता आणि बंधूता जिथे नांदते, तो देश प्रगती करतो, असा विचार डॉ. आंबेडकरांचा होता. आपण आज हा विचार आपल्याकडे रुजलेला दिसत नाही. समानता आणि बंधूतेनेच एक चांगला समाज निर्मिला जाईल, हे महत्त्व आपण ओळखून त्या विचाराने चालले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com