#नालेसफाई :  नाल्यांची नव्हे, तर तिजोरीचीच सफाई!

#नालेसफाई :  नाल्यांची नव्हे, तर तिजोरीचीच सफाई!

पुणे -  शहरातून वाहणारे ओढे-नाले आकसले, काही गायब झाले, किंबहुना ते गायब करण्यात आले. परिणामी, ओढ्या-नाल्यांची संख्या घटली. तरीही, ओढ्या-नाल्यांचे जतन करीत असल्याचे दाखवत महापालिकेने एक किलोमीटर लांबीच्या नाल्याच्या दुरुस्तीवर वर्षाकाठी एक कोटी रुपये खर्च केला आहे. 

त्यात पावसाळापूर्व कामांसह वर्षभर त्याची निगा राखणे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजे, साडेतीनशे किलोमीटर लांबीच्या ओढ्यांच्या देखभालीवर साडेतीनशे कोटी खर्च झाल्याचे उघड आहे. इतका पैसा कसा काय खर्च झाला, या प्रश्‍नावर महापालिकेचे मुख्य खाते क्षेत्रीय कार्यालयाकडे, तर क्षेत्रीय अधिकारी महापलिकेतील खातेप्रमुखांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे ओढ्या-नाल्यांत भरमसाट पैसा कोणी घातला, याचा शोध लागणे अवघड झाले आहे. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर लोकवस्त्यांमधील ओढे-नाल्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी ‘सकाळ’ने शुक्रवारी पुन्हा सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, बापोडी, कल्याणीनगर, कोरेगाव परिसराची पाहणी केली.   

वाढता वाढे  खर्चाचा आकडा
२००२-२००३ मध्ये शहरात सुमारे पाचशे किलोमीटर लांबीचे ओढे-नाले होते. तेव्हा त्यांची संख्या अडीचशे होती. संख्या कमी झाली नसली तरी बहुतांशी भागातील ओढ्या-नाल्यांची लांबी मात्र दीडशे किलोमीटरने कमी झाली आहे. एकीकडे वर्षाकाठी ओढ्या-नाल्यांची दुरुस्ती होत असेल तर त्यांची लांबी कमी होण्याचा प्रश्‍नच नाही; पण असे होऊनही त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असल्याचा महापालिकेचा दावा पूर्णपूणे फसवा आहे. अर्थात, महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखतच ओढे-नाले गायब झाले, पण त्यांच्या देखभालीचा खर्च मात्र वाढत राहिला, हे आश्‍चर्ययुक्त सत्य आहे. 

अधिकारी, नगरसेवकांचे दुर्लक्ष
जेव्हा ओढा-नाल्यांची संख्या आणि लांबी कमी झाली, तेव्हाच त्यांची रुंदीही त्याच प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. ओढ्या-नाल्यांलगतच काय, तर काही भागात त्यावर बांधकामे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे नैसर्गिक नाले बुजविल्याचे उघड आहे. याबाबत वारंवार तक्रारी आल्या; पण नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी त्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही.  

नैसर्गिक स्रोतांना धोका
ओढ्यांचे पात्र अरुंद झाल्याने जोराच्या पावसात पाणी तुंबण्याच्या घटना घडू शकतात. तशा त्या घडल्याही आहेत आणि त्याचा परिणाम वित्तहानी, जीवितहानीत झाला आहे. त्यामुळे नैसर्गिक स्त्रोतांचे जतन करताना त्यांच्या मूळ प्रवाहाला कुठेही धोका निर्माण होणार नाही, याकडे लक्ष द्यायला हवे. प्रत्यक्षात मात्र, याच बाबीकडे काणाडोळा होत असल्याने ओढे-नाले जीवघेणे होण्याची शक्‍यता आहे. 

अंबिल ओढ्याची स्थिती बिकट
शहरातील सर्वांत मोठा असलेल्या अंबिल ओढ्याच्या परिसरात दोन वर्षांपूर्वी एक तरुणाला जीव गमवावा लागला. त्याचे कारण, केवळ तेथील नाल्यातील कचरा आणि गाळ हेच होते. त्यामुळे हा ओढा आणि नाले साफ केले जातील, असे महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांनी सांगितले होते; परंतु, यंदा याच ओढ्याची स्थिती फारच वाईट आहे. येथील कचरा आणि गाळ काढल्याचे दाखविले असले तरी, तो तिथेच पडून आहे. त्यामुळे पावसात तो पुन्हा ओढ्यात वाहून जाण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com