पुणे - 'धर्म आणि धर्मांधता यामध्ये फरक असून, तो समजून घ्यायला हवा. काही जणांना धर्मांधतेचे स्तोम माजवून हा देश मध्ययुगीन हुकूमशाहीकडे घेऊन जायचा आहे. बोलता न येणाऱ्या मुलांनाही धर्माचे धडे दिले जात आहेत, हे खूप दुर्दैवी आहे. अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत मुलांना कोणताही धर्म शिकवला जाऊ नये, त्यानंतर त्यांना पर्याय निवडून जे स्वीकारायचे आहे ते स्वीकारू द्यावे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर यांनी केले.
यशदा येथे विश्वकर्मा पब्लिकेशन्स आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित "पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल'चे उद्घाटन जावेद अख्तर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. संयोजिका मंजिरी प्रभू, विश्वकर्मा प्रकाशनाच्या संचालिका तृप्ती अगरवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, एमआयटीचे डॉ. रविकुमार चिटणीस, स्टोरी इंकचे सिद्धार्थ जैन आदी उपस्थित होते. या वेळी विश्वकर्मा पब्लिकेशनतर्फे नीता कुलकर्णी यांच्या "दि हवामहल मर्डर्स' यासह इतर साठ पुस्तकांचे प्रकाशन झाले.
जावेद अख्तर म्हणाले, 'पैसा, प्रतिष्ठा आणि खोट्या विकासाच्या मागे लागून आपण संस्कृती हरवून बसलो आहोत. याची जाणीव पिढीला करून दिल्यास समाजात माणुसकी दृढ होईल. सत्तर वर्षांत या देशात काहीच झाले नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. देशाने प्रगती केली आहे आणि ती कोणत्याही एका व्यक्तीच्या नव्हे, तर समाजाच्या जिवावर केली. समाजाचे जे चित्र चित्रपटांमध्ये दिसते; पूर्वी नवरा मद्य पिऊन आला, की पत्नी त्याचे बूट काढत असल्याचे चित्रपटांमध्ये दाखविले जात होते, आता हे चित्र दिसत नाही. मी माझ्या मूल्यांसाठी अनेक चित्रपटांना नकार दिला आहे. सभ्यता कधीही सोडली नाही.''
मंजिरी प्रभू म्हणाल्या, 'जावेद अख्तर यांचे कार्य आणि कविता या सर्वांसाठी प्रेरक आहेत. त्यांच्या कवितांमुळे अनेकजण साहित्याकडे वळले आहेत.'' रेणू आर्या यांनी सूत्रसंचालन केले. विशाल सोनी यांनी आभार मानले.
|