कमी दाबाचा पिकांना शॉक

Electricity
Electricity

उरुळी कांचन - पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, सोरतापवाडी, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, तरडे, वळती, शिंदवणे, आळंदी म्हातोबाची या प्रमुख गावांसह दौंड तालुक्‍यातील डाळिंब परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे. दोन्ही कालव्यांतील पाणी उशाला असूनही केवळ कमी दाबाच्या विजेमुळे वीजपंप चालत नसल्याने भाजीपाला, फूलशेती तसेच ऊस यांसारखी पिके कोमजून जाऊ लागली आहेत. खंडित आणि कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे पूर्व हवेलीतील वीस हजारांहून अधिक शेतकरी अडचणीत आहेत.

पूर्व हवेलीतील वरील सर्व गावांना थेऊर (ता. हवेली) येथील केंद्रासह वळती फीडरच्या मदतीने शेती व घरगुती वापरासाठी वीजपुरवठा केला जातो. गेल्या सहा महिन्यांपासून वळती फीडरमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरगुती वापर, शेती व उद्योगासाठी विजेची मागणी दीडपट वाढली आहे. वळती फीडर उभारताना, त्यावरून तीनशे ॲम्पियरच्या आसपास दाबाच्या विजेची मागणी होती. मात्र गेल्या सुमारे वीस वर्षांत कृषी, घरगुती व उद्योगासाठी लागणाऱ्या विजेची मागणी पाचशे ॲम्पियरपर्यंत पोचली आहे. क्षमतेपेक्षा वीजपुरवठा पाढल्याने वळती फीडरमध्ये सातत्याने बिघाड होत आहे. दुसरीकडे वळती फीडरचा विस्तार सुमारे नव्वद किलोमीटरच्या आसपास असल्याने त्यावरून होणारा वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे. 

रेल्वेची परवानगी मिळविण्यात अपयश
कमी दाबाने पुरवठा व वारंवार बिघाड यातून मार्ग काढण्यासाठी महावितरणने चार वर्षांपूर्वी वळती फीडरचा काही भाग कोरेगाव मूळ उपकेंद्राशी जोडण्याचे नियोजन केले होते. मात्र पुणे-दौंड लोहमार्गाच्या खालून थेऊर फाटा व उरुळी कांचन येथे विद्युतवाहक तारा टाकाव्या लागणार आहेत. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळविण्यात महावितरण अपयशी ठरले आहे. त्याचा फटका पूर्व हवेलीतील शेतकरी आणि या परिसरातील उद्योगधंद्यांना बसत आहे.

 जुन्या व नव्या दोन्ही कालव्यांना पाणी
 कमी दाबामुळे वीजपंप बंद
 वळती फीडरमध्ये बिघाड
 भाजीपाला, फुले, ऊस शेतीला फटका
 सुमारे २० हजार शेतकऱ्यांचे नुकसान 

नवीन व जुन्या मुळा-मुठा कालव्यांतून गेल्या काही दिवसांपासून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. मात्र कमी दाबाच्या विजेमुळे पंप चालू होत नाहीत. वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने चालू झालाच तर वळती फीडरवरून तो खंडित होण्यास सुरवात होते. कालवे तुडुंब वाहत असतानाही, विजेअभावी पिके जळून जाण्याचा धोका वाढला आहे. याबाबत वीज कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करूनही आश्‍वासनाशिवाय काही मिळत नाही.
- संभाजी सर्जेराव महाडिक, शेतकरी, शिंदवणे, ता. हवेली 

शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन सोमवारी (ता. १६) महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून, पुढील आठवडाभरात वीजपुरवठा तात्पुरता सुरळीत करण्याकडे लक्ष पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. वळती फीडरचा काही भाग कोरेगाव मूळ उपकेंद्राशी जोडण्यासाठी थेऊर फाटा व उरुळी कांचन येथे लोहमार्गाच्या खालून वीजतारा टाकण्यासंदर्भात परवानगी मिळविण्यासाठी दोन दिवसांत दिल्लीला जाणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन परवानगी मिळविणार आहे.
- बाबूराव पाचर्णे, आमदार

पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, लोणी काळभोरसह अनेक गावांमध्ये वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे, हे खरे आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वीज कंपनीने चार वर्षांपूर्वी वळती फीडरचा काही भाग कोरेगाव मूळ उपकेंद्राशी जोडण्याचे नियोजन केले होते. मात्र थेऊर फाटा व उरुळी कांचन येथे लोहमार्गाखालून वीजतारा टाकण्यास रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने काम रखडले आहे. पुढील पंधरा दिवसांत वळती फीडरवरून वीज खंडित होण्याचे प्रमाण कमी करण्याबरोबरच वीजपुरवठा पूर्ण दाबाने होण्याकडे लक्ष पुरवण्यात येईल.
- आर. एस. बुंदेले, कार्यकारी अभियंता, महावितरण, मुळशी विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com