एल्गार परिषदेचा संबंध नाही - कोळसे पाटील

BG-Kolse-Patil
BG-Kolse-Patil

पुणे - सुधीर ढवळे सोडले, तर डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्यासह कुणाचेही तोंड मी पाहिलेले नाही. यल्गार परिषदेचा कोरेगाव भीमा प्रकरणाशी संबंध नाही. खोटे पुरावे तयार करून वैचारिक विरोधकांना संपविण्याचा हा प्रयत्न आहे. तेलतुंबडे यांचा एल्गार परिषदेला विरोध असेल, तर त्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध कसा, असा प्रश्‍न करीत त्यांना सर्व कायदेशीर मदत करणार असल्याचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी सांगितले. 

डॉ. तेलतुंबडे यांची पोलिसांकडून मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोप करीत भूमिका स्पष्ट करण्यासाठी फुलेवाडा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या वेळी कोळसे पाटील बोलत होते. या वेळी प्रा. विलास वाघ, आनंद पटवर्धन, मनीषा गुप्ते, माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी उद्धव कांबळे उपस्थित होते. एल्गार परिषदेसाठी कुणाकडूनही पैसे घेतले नाहीत, तर नक्षलवाद्यांकडून कसे घेऊ? या परिषदेचा आणि नक्षलवाद्यांचा संबंध कसा? असे प्रश्‍न कोळसे पाटील यांनी उपस्थित केले.

तेलतुंबडे आणि अन्य अकरा जणांना नक्षलवादी ठरवून लक्ष्य केले जात आहे. निवडणुका आल्या आहेत म्हणून विरोधक तुरुंगात राहिले पाहिजेत, अशी व्यवस्था निर्माण केली आहे. न्यायव्यवस्थेकडूनही आता अपेक्षा नाहीत. ही तर देशातील महाआणीबाणी आहे, अशी टीका त्यांनी केली. राज्यघटनेने दिलेल्या प्रत्येक स्वातंत्र्यावर गदा आली आहे. कालांतराने ही राज्यघटना जाऊन हिंदू राज्यघटना प्रस्थापित होण्याचा धोका आहे, असे गुप्ते म्हणाल्या.

डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी कधीही प्रक्षोभक लिखाण केलेले नाही. ते आंबेडकरी चळवळीतील आहेत, डाव्या विचारांचे आहेत, परंतु नक्षलवाद्यांशी त्यांचा संबंध नाही. त्यांना गोवण्यात आले आहे. 
- प्रा. विलास वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com