पुणे : बाजार समिती, पोलीस प्रशासनाने मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. सोमवारपासून बाजारातील डमी, किरकोळ लिंबू विक्रेते आणि रिक्षाला प्रवेश दिला जाणार नाही. तसेच अडते आणि खरेदीदारांना बाजार समितीकडून पास दिले जात आहेत. प्रवेशद्वारावर ओळखपत्र आणि पास दाखविल्याशिवाय बाजारात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी शुक्रवारी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन आणि बाजार समिती प्रशासन यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. यावेळी सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक आयुक्त राजेंद्र गलांडे, बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, उपसचिव सतीश कोंडे, अडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ आदी उपस्थित होते.
मार्केट यार्डातील विविध विभागात साधारणतः दोन हजार डमी विक्रेते आहेत. हे विक्रेते गाळ्यासमोर थांबून विक्री करीत असतात. तसेच डमी किरकोळ विक्री करीत असल्याने ग्राहकांचीही गर्दी होते. त्यामुळे डमी तसेच लिंबू विक्रेत्यांवर बंदी घालण्यात आली आहे. अडत्यासह चार पास दिले जाणार आहेत. तसेच खरेदीसाठी येणार्यांनाही पास दिला जाणार आहे. शेतीमाल माल घेऊन येणार्या गाड्यांना एक नंबरच्या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाणार आहे, तर खरेदीदारांच्या गाड्यांना 4 नंबरच्या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाणार असल्याचेही गरड यांनी सांगीतले.
प्रत्येक अडत्याला फक्त चार पास
मार्केट यार्डात रिक्षा संपूर्ण बंद
गेट नंबर ७ फक्त व्यावसायिक वाहेन उभी राहतील
डमी विक्रेते आणि किरकोळ लिंबू विक्री बंद
ओळखपत्राशिवाय बाजारात प्रवेश नाही
30 पोलीस आणि बाजार समिती कर्मचारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी
नियम मोडले तर गुन्हे दाखल करणार
सोमवारी भुसार बाजारातील सर्व मालाच्या गाड्या १२ नंतर खाली होणार
वाहनतळावर पास किंवा ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश नाही. अन्यथा संबधित ठेकेदारावर कारवाई
३० तारखे पर्यंत बाजार समिती, वाहतूक पोलीस, पोलीस यांच्या समन्वयाने बाजार सुरू राहणार
मार्केटयार्डात येणार्या सर्व रस्त्यांवर सोमवारपासून बॅरिगेटस् लावण्यात येणार आहेत. उत्सव चौक शिवनेरी रस्ता, गेट नंबर सात बिबवेवाडी रस्ता, पोस्ट ऑफीस चौक यासह छोट्या रस्त्यांवरही बॅरिगेटस लावले जाणार आहेत. त्यामुळे सोमवारपासून ओळखपत्र आणि पास असेल, तरच बाजारात प्रवेश दिला जाणार आहे. अन्यथा मार्केटयार्डात जाणार्यांना रिकाम्या हातानी परतावे लागणार आहे. तसेच कारवाई ही करण्यात येणार आहे.
मार्केट यार्डातील विविध विभागात माल घेऊन येणार्यांची संख्या मोठी आहे. तसेच खरेदी करणार्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे येथे गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी प्रभावी उपाय-योजना करण्यात आल्या आहेत. पोलिस बाजारातील परिस्थितीवर लक्ष ठेवून असणार आहेत. सोमवारपासून मार्केटयार्डात नियम मोडणार्यांवर कडक कारवाई केली जाईल.
- रविंद्र शिसवे, सहपोलिस आयुक्त.
प्रशासनाला सहकार्य करावे
कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी सर्वांचेच सहकार्य अपेक्षित आहे. आडते आणि व्यापार्यांनी नियम मोडल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. सर्वांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
- नम्रता पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ पाच.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.